नवी दिल्ली : जलिकट्टूवरुन तामिळनाडू पेटल्याने याची दखल केंद्रानेही घेतली आहे. तामिळनाडूत चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कायदे मंत्रालयाने जलिकट्टू अध्यादेशाला काही बदलांसह मंजुरी दिली आहे. हा अध्यादेश अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवला जाईल. त्यामुळे आता राष्ट्रपतींच्या शिक्कामोर्तबाची प्रतिक्षा आहे.


कुणी-कुणी आवाज उठवला आहे?

जलिकट्टू या पारंपारिक खेळाला परवानगी मिळावी, यासाठी आता लाखो लोकांसोबत सेलिब्रिटींनीही आवाज उठवला आहे. ख्यातनाम संगीतकार ए. आर. रहमान यांनी एक दिवसाचं उपोषण केलं. रहमान यांच्यासोबत अभिनेते रजनीकांत, अभिनेते कमल हसन, विख्यात बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद, आर अश्विन, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रवीशंकर यांनी जलिकट्टूचं समर्थन केलं आहे.

काय आहे जलीकट्टू?

जलीकट्टू हा तामिळनाडूतील सुमारे 400 वर्षांपूर्वीचा पारंपारिक खेळ आहे. पीकं कापणीच्यावेळी हा खेळ खेळला जातो. यामध्ये 300-400 किलोच्या बैल/सांड यांच्या शिंगांना नोटा बांधल्या जातात. त्यानंतर बैलाला भुजवून चिडवलं जातं आणि गर्दीत सोडून देतात. या खेळात भाग घेणाऱ्यांनी त्या बैलांची शिंगं पकडून त्याला शांत करायचं असतं.

प्राणीप्रेमींचा आरोप

बैलांना चिडवण्यासाठी त्यांना मद्य पाजून, मारहाण करुन उसकावलं जातं असा आरोप प्राणीमित्र संघटनांचा आहे. अशा पिसाळलेल्या बैलाला काही अंतरावरच रोखण्याचा हा खेळ आहे. फक्त स्पेनमधल्या बुल फाईटप्रमाणे इथे बैलाला जीवे मारलं जात नाही. बैलगाडी शर्यतींमध्येही अशा पद्धतीने बैलांना मारहाण होत असल्याचा आरोप आहे.