नवी दिल्ली: लातूर एक्स्प्रेसचा वाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. मराठवाड्यातील नेत्यांनी थेट दिल्लीत रेल्वे मंत्रालयातच डेरा टाकला.


विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यापाठोपाठ कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. त्याआधी लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनीही रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली होती.

सध्याची लातूर-मुंबई एक्स्प्रेस ही लातूरपर्यंतच ठेवण्याची जी मूळ मागणी होती ती मान्य झालेली नाहीच. शिवाय 1 जुलैपासून बिदर- मुंबई एक्सप्रेस या नव्या रेल्वेला मंजुरी देण्यात आली आहे. ही रेल्वे दररोज धावणार आहे.

यापूर्वी ही रेल्वे आठवड्यातून 3 दिवस धावणार होती, मात्र ती रेल्वे बिदर नव्हे तर लातूरपर्यंतच असावी अशी मागणी करत लातूरकरांनी आंदोलन केलं होतं. पण आता तीच रेल्वे आठवड्यातून तीन दिवस नव्हे तर दररोज धावणार आहे.

लातूरची ट्रेन बिदरला पळवली असा जो प्रचार होतोय, त्याला उत्तर म्हणून यशवंतपूरहून बिदरला येणारी ट्रेन जिचा स्टॉप बिदरलाच असायचा ती आता लातूरपर्यंत वाढवली जाणार आहे. तीन आठवड्यात ही रेल्वे सुरू होईल.

नव्या बिदर-मुंबई रेल्वेची घोषणा

या वादानंतर आता बिदर-मुंबई अशी नवी रेल्वे 1 जुलैपासून सुरु होणार आहे.

ही रेल्वे दररोज धावणार असून, लातूर,उस्मानाबाद, बिदर या तीनही भागांना समान कोटा राहणार आहे. शिवाय यशवंतपूर ते बिदर जाणारी रेल्वे लातूरपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

इतकंच नाही तर लातूर- गुलबर्गा ही रेल्वे तीन आठवड्यांत सुरु होणार  आहे.

रेल्वे मंत्र्यांच्या भेटीत कोण काय म्हणालं? 

धनंजय मुंडे

मुंबई-लातूर रेल्वे बिदर ऐवजी परळी पर्यंत करावी, मुंबईसाठी परळीतून आणखी स्वतंत्र रेल्वे सुरु करावी,

परळी - बीड - नगर रेल्वे मार्गाचे काम नगरप्रमाणे परळीच्या बाजूनेही सुरु करावे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

संभाजी पाटील निलंगेकर

मुंबई- लातूर रेल्वे ही लातूरपर्यंतच हवी, त्यानंतर हवं तर शटल सेवा पुण्यापर्यंत करा, अशी मागणी संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली.

दक्षिणेतल्या यशवंतपूरपासून बिदरपर्यंतची ट्रेन उलट लातूरपर्यंत वाढवा, असंही त्यांनी नमूद केलं.

काय आहे लातूर एक्स्प्रेसचा वाद?

लातूर येथून सुटणारी लातूर-मुंबई एक्स्प्रेस बिदरहून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या गाडीत लातूरकरांनाच जागा मिळत नाही, तर बिदरहून सोडल्यानंतर आणखी प्रवाशांची भर पडेल, त्यामुळे लातूरकरांची आणि पुढच्या प्रवाशांची गैरसोय होईल, असं लातूरकरांचं म्हणणं आहे.

गाडी बिदरहून सोडण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी लातूरकर आक्रमक झाले आहेत.

संबंधित बातम्या 

बिदरहून लातूर एक्स्प्रेस सोडल्याने वाद चिघळला

लातूर एक्सप्रेस बिदरहून सोडण्यास विरोध, लातूर-उस्मानाबादमध्ये बंद