corona : देशातील कोरोनाचा धोका हळूहळ कमी होत आहे. कालच्या दिवसापेक्षा आज थोड्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 15 हजार 102 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 278 जणांचा मृत्यू झाला आहे. काल देशात 13 हजार 405 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती तर 235 जणांचा मृत्यू झाला होता. आज रुग्णसंख्येत थोडी वाढ झाली आहे. तर मागच्या 24 तासामध्ये 31 हजार 377 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. विशेष बाब म्हणजे सलग चौथ्या दिवशी देशात 20 हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.


कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून आजपर्यंत देशात 4 कोटी 28 लाख 67 हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर याकाळात 5 लाख 12 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत  4 कोटी 21 लाख 89 हजार लोक कोरोनामतून बरे झाले आहेत. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाखांपेक्षा कमी झाली आहे. सध्या देशात 1 लाख 64 हजार 522 सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये कमालीची घट झाली आहे.


 





दरम्यान, सध्या देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. ज्यांनी ज्यांनी लस घेतली नाही अशांना लसीकरण करुन घेण्याचे आवाहन सरकारच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. आत्तापर्यंत देशात 176 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात देशात 33 लाख 84 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. आत्तापर्यंत एकूण लसीचे 176 कोटी 19 लाख 39 हजार डोस देण्यात आले आहेत.


देशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण हे 1.20 टक्के आहे, तर बरे होण्याचे प्रमाण 98.42 टक्के आहे. सक्रिय प्रकरणे 0.38 टक्के आहेत. कोरोना सक्रिय प्रकरणांमध्ये भारत आता जगात 38 व्या क्रमांकावर आहे. एकूण संक्रमित संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अमेरिका आणि ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू हे भारतात झाले आहेत.


दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून आटोक्यात येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 1080 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय राज्यात 2 हजार 488 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी देखील परतले आहेत. ओमायक्रॉनबाधितांचा विचार करता आतापर्यंत 4509 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 3994 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.