बद्रीनाथ/उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळं हजारो भाविक अडकले आहेत. या भूस्खलनात महाराष्ट्रातले एकूण 179 भाविक, तर अहमदनगरचे भाविक शुक्रवार संध्याकाळपासून काशीमठ परिसरात अडकून पडले आहेत.


स्थानिकांच्या मदतीने त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आल्याची माहिती मिळती आहे. या भूस्खलनात देशभरातील साडे 13 हजार भाविक अडक्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.

दरम्यान सर्व भाविक सुखरुप असून राज्य सरकारच्या संपर्कात असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे. भूस्खलनानंतर रस्त्यावर पडलेल्या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.

रस्त्यावरील मातीचे ढिगारे हटवून वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे बद्रिनाथकडे जाणारी वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागणार आहे.

परळीतील सात भाविक मदतीच्या प्रतिक्षेत

उत्तराखंड येथील जोशीमठ येथे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सात भाविक अडकले आहेत. जोशीमठ येथून सहा किलोमीटरवर हात्तीपहाड आहे. त्या ठिकाणी भूस्खलन झालं आहे. हे सर्व जण काल दुपारी दोन वाजल्यापासून अडकून आहेत.

अडकलेले सर्व परळी तालुक्यातील सारडगाव येथील रहिवासी आहेत. आमच्याकडे कुणाचाही संपर्क नाही, शिवाय कालपासून मदतीच्या प्रतिक्षेत आहोत, लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी या भाविकांनी केली आहे.

दरम्यान या सात जणांशी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी संपर्क साधला. लागेल ती मदत देण्याचं आश्वासन प्रीतम मुंडे यांनी दिल्याची माहिती आहे.