भाजपचं तारुण्य आता संपलं आहे: लालू प्रसाद यादव
एबीपी माझा वेब टीम | 19 May 2017 05:10 PM (IST)
पाटणा: राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आज (शुक्रवारी) भाजपवर जोरदार निशाणा साधला. 'भाजपचं तारुण्य संपलं आहे. त्यामुळे एनडीएचं हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळही पूर्ण करु शकणार नाही.' अशी टीका लालू प्रसाद यादवांनी केलीआहे. बेनामी संपत्ती प्रकरणी आयकर विभागनं नुकतंच लालू प्रसाद यादव यांच्या 22 ठिकाणांवर छापे मारले होते. यानंतर आज पहिल्यांदाच पत्रकारशी बोलताना लालू प्रसाद यादव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. 'गेलेलं तारुण्य कधीही परत येत नाही, मग तुम्ही कितीही तूप-रोटी खा.' असा टोला त्यांनी भाजपला हाणला. आयकर विभागानं केलेल्या छापेमारीमुळे लालू प्रसाद यादव चांगलेच भडकले आहेत. त्यामुळे त्यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला. 'ज्यांनी अब्जावधी रुपये लुटले ते आता आमच्यावर आरोप लावत आहेत.' असं म्हणत लालू प्रसाद यांनी भाजपवर निशाणा साधला. 'भाजपला दिल्लीतून हटवेन तेव्हाच मी शांत बसेन.' असंही यावेळी लालू प्रसाद म्हणाले. 'एनडीए सरकारनं तीन वर्षात एवढे गुन्हे केले आहेत की, ते आता पाच वर्षही पूर्ण करु शकणार नाहीत. 27 ऑगस्टला समान विचारधारा असणारे पक्ष एक रॅली काढणार आहेत. असंही लालूंनी सांगितलं. संबंधित बातम्या: लालू प्रसाद यादव यांच्या 22 ठिकाणांवर आयकर विभागाचा छापा