कोची : केरळमध्ये मागील 48 तासांपासून पावसाचं थैमान सुरु आहे. या पावसात आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे केरळात पूरस्थिती निर्माण झाल्याने राज्यातील 24 बंधारे उघडण्यात आले आहेत. केरळात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.


वायनाडमध्ये अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचं नुकसान झालं आहे. k

राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि अनेक मंत्र्यांसह विरोधीपक्षाच्या नेत्यांनी इडुक्की, वायनाड, कालिकट आणि कोचीचा हवाई दौरा केला. तर गृहमंत्री राजनाथ सिंह 12 ऑगस्ट म्हणजे रविवारी केरळचा दौरा करणार आहेत.

अनेक ठिकाणी रेड अलर्ट
पावसामुळे ओढावलेल्या परिस्थितीमुळे अनेक परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वायनाडमध्ये 14 ऑगस्तपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. तर इडुक्कीमध्ये 13 ऑगस्तपर्यंत इशारा देण्यात आला आहे. कोट्टायम, एर्नाकुलम, मलप्पुरम, पलक्कड, कोझिकोडेमध्ये 11 ऑगस्टपर्यंत हाय अलर्ट जारी केला आहे.

50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पावसामुळे नुकसान
केरळमध्ये मागील 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाज पावसामुळे एवढं भीषण नुकसान झालं आहे. मुसळधार पाऊ आणि धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अस्मानी संकटामुळे केरळचं चित्रच बदललं आहे. शेत, गावं पाण्याखाली गेले आहेत. या पुरामुळे आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला असून 54 हजारांपेक्षा जास्त लोक बेघर झाले आहेत.

सैन्य आणि एनडीआरएफची मदत
बचावासाठी सैन्य आणि नौदलाची पथकं तैनात केली आहेत. स्थानिकांच्या मदतीसाठी आणि रस्ते दुरुस्तीसाठी सैन्य आणि एनडीआरएफची पथकं कार्यरत आहेत. बचावासाठी 241 रिलीफ कॅम्प सुरु करण्यात आले आहेत.

पाऊस आणि पुरामुळे शाळा-कॉलेज बंद
पावसामुळे केरळमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. शाळा, महाविद्यालय, कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.  हवामान विभागाने आणखी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. केरळमध्ये यंदा आतापर्यंत सरासरीपेक्षा 19 टक्के जास्त पाऊस झाला आहे. याआधी 2013 साली केरळमध्ये सर्वाधिक पाऊस पडला होता.