नवी दिल्ली:  केरळच्या कोझीकोडमध्ये एअर इंडियाचं एक विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत विमानाच्या दोन पायलटसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 123 प्रवासी जखमी झाले आहेत तर 15 प्रवासी गंभीर जखमी आहेत. या अपघातात आपला जीव गमावून कित्येक जीव वाचवणारे कॅप्टन दिपक साठे हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते. कॅप्टन दिपक वसंत साठे हे एअर फोर्सचे टेस्ट पायलट होते. एअर फोर्सचे टेस्ट पायलट अनेक एयरक्राफ्टवर टेस्ट करत असतात.


या अपघात झालेल्या विमानाचे पायलट कॅप्टन दिपक वसंत साठे आणि कॅप्टन अखिलेश कुमार हे दोघे होते. कॅप्टन दिपक साठे हे फायटर पायलट होते. ते राष्ट्रीय सुरक्षा अकादमी (NDA) चे माजी विद्यार्थी होते. त्यांना अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. एअर फोर्समधले एक कुशल लढाऊ पायलट असा त्यांचा लौकिक होता. वायु सेना अकादमीकडून स्वॉर्ड ऑफ ऑनर प्राप्त कॅप्टन दिपक साठे यांनी मिग विमानं सर्वाधिक वेळा चालवली होती. या दोन्ही पायलट कॅप्टननी आपला जीव गमावत जवळपास 170 लोकांचा जीव वाचवला.

केरळमध्ये एअर इंडियांचं विमान लँडिंगदरम्यान दुर्घटनाग्रस्त, 16 जणांचा मृत्यू

सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीजचे संचालक एअर वायस मार्शल मनमोहन बहादुर यांनी साठे यांच्याविषयी ट्वीट केलं आहे. ते म्हणतात, दिपक साठे माझ्यासोबत टेस्ट पायलट म्हणून होते. ते अनुभवी पायलट होते. "RIP Tester".

मिळालेल्या माहितीनुसार दुबईहून कालीकत येथे येणारं एअर इंडियांचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं. रनवेहून घसरुन पुढे हे विमान निघून गेलं, त्यामुळे ही दुर्घटना झाली आहे. एअर इंडियाचं विमान IX-1344 हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. घटना घडल्यानंतर विमान दरीत कोसळलं आणि विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, विमानात दोन पायलटसह सहा क्रू मेंबर्स होते. तर विमानात 191 प्रवाशी प्रवास करत होते, ज्यामध्ये 10 मुलांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. कोझिकोडमध्ये विमान अपघात झाल्याने मी दु:खी झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावे. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्याशी मी बोललो. अधिकारी घटनास्थळी आहेत, जखमींना सर्व मदत मिळत आहे.