बेळगाव : महाराष्ट्र सरकार बरोबर परस्पर पाणीवाटप करार करण्यासाठी कर्नाटक सरकार तयार असल्याची माहिती कर्नाटकचे जलसंपदा मंत्री डी. के.शिवकुमार यांनी दिली. दरवर्षी कृष्णा नदीच्या काठावरील गावांना उन्हाळ्यात भेडसावत असणारी पाणी समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी कर्नाटकने ही तयारी दर्शवली आहे.


महाराष्ट्रातून कृष्णा नदीचं पाणी सोडण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी कर्नाटक जल निगमच्या कार्यालयात बेळगाव, बागलकोट आणि विजापूर येथील आमदार, खासदार यांची बैठक बोलवण्यात आली होती. दरवर्षी महाराष्ट्रातून उन्हाळ्यात कर्नाटकातून वाहणाऱ्या कृष्णा नदीचं चार टीएमसी पाणी सोडण्यात येतं.

2004 पासून 2017 पर्यंत कर्नाटकने महाराष्ट्राकडून पाणी विकत घेतले आहे. यापुढे परस्पर पाणी वाटप करार करुन दोन राज्यातील पाणी समस्या निवारण्यासाठी कर्नाटक सरकार तयार असून त्या संबंधीचे पत्र राज्याच्या मुख्य सचिवांकडून महाराष्ट्र सरकारला पाठवण्यात येईल.

पाणी वाटप करार कसा असावा या संबंधी निर्णय घेण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती तांत्रिक आणि अन्य बाबींचा विचार करुन अहवाल देणार आहे. त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र कर्नाटकला पाणी देण्याबाबत पाणी वाटप करार लवकरच करण्यात येईल, असंही जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितलं.

महाराष्ट्र दरवर्षी कोयनेतून चार टीएमसी पाणी चिकोडी, बागलकोट आणि विजापूरला सोडतो. तसेच चार टीएमसी पाणी कर्नाटकने अलमट्टी धरणातून सोलापूर आणि जतसाठी दरवर्षी सोडावे, अशी महाराष्ट्राची मागणी आहे. खरीप आणि रब्बी हंगामात दोन टीएमसी पाणी कर्नाटकने द्यावे, असा प्रस्ताव महाराष्ट्राकडून आला आहे अशी माहितीही डी. के. शिवकुमार यांनी दिली.