Karnataka CM Siddaramaiah: कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर सिद्धरमय्या (Karnataka CM Siddaramaiah) अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच त्यांनी कामांचा सपाटा लावला आहे. नवनिर्वाचित सिद्धरमय्या (Siddaramaiah) सरकारच्या पहिल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये त्यांनी सर्वात आधी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली. त्यानंतर रविवारी (21 मे) रोजी त्यांनी एक विशेष आदेश जारी केला. ज्यामध्ये त्यांनी बंगळुरू पोलिसांना (Bangalore Police) मुख्यमंत्र्यांसाठीचा 'झिरो ट्रॅफिक प्रोटोकॉल' (Zero Traffic Protocol) मागे घेण्यास सांगितलं. 


सीएम सिद्धरमय्या म्हणाले की, लोकांच्या समस्या लक्षात घेऊनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सिद्धरामय्या यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. रविवारी सिद्धरमय्या यांनी ट्वीट केलं की, "मी बंगळुरू शहर पोलीस आयुक्तांना माझ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी 'झिरो ट्रॅफिक प्रोटोकॉल' मागे घेण्यास सांगितलं आहे. लोकांच्या समस्या पाहून मी हा निर्णय घेतला आहे. जिथे 'झिरो ट्राफिक प्रोटोकॉल' लागू करण्यात आला आहे, तिथे लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो." दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया देत त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. अनेक युजर्सनी 'आऊटस्टॅडिंग सीए', असं म्हणत कमेंट केल्या आहेत. तर काहींनी 'मुख्यमंत्री असावा असा', असं म्हणत सिद्धरमय्या यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.






सिद्धरमय्या फुलांचे हार किंवा शॉल स्वीकारणार नाहीत


यासोबतच सीएम सिद्धरमय्या यांनी सत्कार करताना दिलेले फुलांचे पुष्पगुच्छ, हार किंवा शॉल स्वीकारणार नसल्याचं जाहीर केलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे. "मी लोकांकडून फुलांचे पुष्पगुच्छ, हार किंवा शॉल न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, जे नेहमीच सत्कार करताना देतात. हे वैयक्तिक आणि सार्वजनिक दोन्ही कार्यक्रमांमध्ये घडतं. लोक त्यांचं प्रेम भेट म्हणून देतात. जर तुम्हाला अधिक आदर व्यक्त करायचा असेल तर, तुम्ही पुस्तकं देऊ शकता. तुमचं सर्व प्रेम आणि आपुलकी माझ्या पाठीशी राहो."






सिद्धरमय्या यांनी मुख्यमंत्री होताच पूर्ण केली जाहीरनाम्यातील आश्वासनं 


'झिरो ट्रॅफिक प्रोटोकॉल'बाबत निर्णय घेण्यापूर्वीच सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री होताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत निवडणूक प्रचारादरम्यान देण्यात आलेल्या आश्वासनांनुसार, पाच हमी योजना लागू केली आहे. काँग्रेसच्या पाच हमी योजनांमध्ये सर्व घरांना 200 युनिट मोफत वीज, प्रत्येक कुटुंबातील प्रमुख महिलेला प्रत्येकी दोन हजार रुपये दरमहा, बीपीएल कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 10 किलो मोफत तांदूळ, बेरोजगार पदवीधर तरुणांना दरमहा रुपये 3000 आणि बेरोजगार पदविकाधारकांना दोन वर्षांसाठी 1500 रुपये आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी मोफत प्रवास, अशा घोषणांची पूर्तता केली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Hijab Ban: हिजाब बंदी काँग्रेस हटवणार? कर्नाटकातील एकमेव मुस्लिम महिला आमदार म्हणतात...