भोपाळ : दैनिक भास्कर समूहाचे संपादक कल्पेश याग्निक यांनी आत्महत्या केली आहे. इंदौर येथील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.


हृदयविकाराच्या झटक्याने कल्पेश याग्निक यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात होते, मात्र त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. कल्पेश याग्निक यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या मुंबईतील एका महिला पत्रकाराविरोधात आयपीसी कलम 306, 386 आणि आयटी अॅक्ट 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ही महिला पत्रकार कल्पेश याग्निक यांना फोन करुन छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती. धमकीच्या आधारे या महिलेने याग्निक यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची मागणी केली होती.

ही पत्रकार महिला अनेक दिवसांपासून कल्पेश यांना ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी करायची, असा आरोप कल्पेश यांचे भाऊ नीरज याग्निक यांनी केला आहे. नीरज यांनी 3 जुलै रोजी अतिरिक्त पोलिस आयुक्त अजय कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.