Joshimath Land Subsidence Update: हिमालयाच्या कुशीत वसलेलं, बद्रीनाथच्या वाटेवर असलेलं जोशीमठ सध्या एका भयानक संकटाला तोंड देतंय. हे शहर जणू जमिनीत खचत चालले आहेत. एकाचवेळी शहरातल्या पाचशेहून अधिक घरांना मोठे तडे गेले आहेत. जोशीमठची ही आजची स्थिती पाहिली तर केदारनाथच्या महाप्रलयासारख्या काही जुन्या घटनाही ताज्या होतात. या दुर्घटना घडण्यामागे नेमकं काय कारण आहे?


जोशीमठ..बद्रीनाथसाठीचं प्रवेशद्वार आहे. भारत चीन सीमेवरचा लष्कराचा मोक्याचा तळ...पण हिमालयाच्या कुशीतलं हे गाव सध्या वेगळ्या कारणांनी  चर्चेमध्ये आहे. एकदोन नव्हे तर इथल्या 500 घरांना असे तडे गेले आहेत. या भेगा पण साध्या नाहीत. सगळ्या शहरावर वीतभर भेगा पडत जमीन फाटली आहे. लोक भयभीत झाले आहेत. रात्री मशाल मोर्चे काढत आहेत 


 जोशीमठमधल्या या संकटाची पहिली चाहूल 1976 मध्येच दिली गेली होती. रस्ते, जलविद्युत प्रकल्प आणि शहर विकासाच्या नावाखाली अतिक्रमण केले तर जोशीमठमध्ये अशी स्थिती उद्भवू शकते याचा इशारा मिश्रा समितीच्या रिपोर्टमध्ये देण्यात आला होता.


 हिमालयातलं हे  शहर खचत का चाललंय? 



  • उत्तराखंडमधल्या चमौली जिल्ह्यात 6150 फूट उंचीवर जोशीमठ वसलं आहे

  •  हिंदूंसाठी पवित्र चारधामपैकी एक धाम बद्रीनाथसाठीचं हे प्रवेशद्वार

  • 20 हजार लोकवस्तीच्या या गावात 500 घरांना अशा मोठ्या भेगा पडल्यात

  •  हिमालयाच्या दरडी कोसळणारी ही जागा, त्याच जागेवर काही वर्षांपूर्वी हे शहर वसलं

  • गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या परिसरात जलविद्युत प्रकल्प, रस्ते रुंदीकरण आणि इतर बांधकामं वाढली

  • चारधामसाठी हायवे रुंदीकरणाचं काम इथं सुरु आहे, जे सध्या स्थानिकांच्या विरोधामुळे थांबवलं गेलं


 जोशीमठमध्ये 4 जानेवारीपासूनच परिस्थिती गंभीर बनत गेली. लोक रात्रीचे मशाल मोर्चे काढत आहेत हायवेची कामं बंद करण्यासाठी निदर्शन करत आहे. एनटीपीसी जे इथल्या जलविद्युत प्रकल्पांची कामं करतंय. त्यांच्या कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली आहे. 


 राज्य आणि केंद्र सरकारनंही याबाबत हालचाली सुरु केल्या. संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांना स्थलांतरित करण्याची मोहीम सुरु झाली आहे. लष्कराचे चॉपर्स त्यासाठी तैनात ठेवले गेल.या संपूर्ण स्थितीबाबत काय करता येईल यासाठी केंद्र सरकारनंही तातडीनं समितीची घोषणा केलीय. पण यात सगळे सरकारीच लोक आहेत. अशा संकटात सरकारी धोरणांचं कडक परीक्षण व्हायचं असेल तर एखाद्या खासगी तज्ज्ञांनाही घ्यायला हवं होतं अशीही टीका होतेय.


जोशीमठमधल्या या भेगा काही अचानक आलेल्या नाहीत. याआधी निसर्गानं दिलेल्या अनेक इशाऱ्यांकडे केलेलं हे दुर्लक्ष आहे. 2021 मध्येही काही ठिकाणी भेगा पडल्याची उदाहरणं होती. त्यामुळे आता या संकटातून तरी काही ठोस धडा आपण घेतो का हे पाहावं लागेल. 2013 पासून हिमालयाने आपलं रौद्र रुप दाखवायला सुरुवात केली आहे. हिमालयाच्या या संकेतांमधून आपण जर धडा घेतलाच नाही. तर आपल्याला आणखी मोठ्या संकटाला तयार राहावं लागणार आहे...