अवघ्या 1% व्याजानं कर्ज, झारखंड सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट
एबीपी माझा वेब टीम | 13 Jun 2017 09:31 PM (IST)
रांची : महाराष्ट्रासह देशभरात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. याच दरम्यान झारखंड सरकारनं एक मोठं पाऊल उचललं आहे. झारखंड सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक खास योजना आणली आहे. यापुढे झारखंडमधील शेतकऱ्यांना अवघ्या 1 टक्के व्याजानं कर्ज मिळणार आहे. जे शेतकरी आपलं कर्ज एका वर्षाच्या आत फेडतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता सरकारकडून मिळणाऱ्या कर्जावर 7 टक्के व्याज आकारलं जातं. एका वर्षात कर्ज फेडल्यानंतर केंद्र सरकार तीन टक्के व्याज माफ करतं. आता त्यात राज्य सरकारदेखील तीन टक्के व्याज कमी माफ करणार आहे. म्हणजेच एकूण कर्जावर शेतकऱ्यांना फक्त 1 टक्के व्याज द्यावं लागणार आहे. दरम्यान, राज्याकडून तीन टक्के सूट घेण्यासाठी बँकांना क्लेम करावा लागणार आहे. क्लेम केल्यानंतरच बँकांना पैसे मिळणार आहेत. पण किसान क्रेडिट कार्डनं कर्ज घेणाऱ्यांनाच ही योजना लागू होणार आहे.