श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील तणाव पाहता आज सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय इंटरनेट आणि मोबाईल सेवाही बंद करण्यात आली आहे. फुटीरतावाद्यांनी आजही विरोध प्रदर्शन करण्याची घोषणा केली आहे.


जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. हळूहळू पूर्वपदावर येत असलेलं काश्मीर पुन्हा एकदा धुमसतंय. यावेळी विद्यार्थ्यांना भडकावून भारतीय जवानांवर दगडफेक करण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. शिवाय आयसिस या दहशतवादी संघटनेचे झेंडेही दाखवले जात आहेत.

श्रीनगरमध्ये झालेल्या विरोध प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलीस आणि लष्कराला अश्रूधुराचा वापर करावा लागला. मात्र अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर विद्यार्थ्यांनी जवानांवर दगडफेक केली.

हिंसाचाराला जबाबदार कोण?

काश्मीर घाटीमध्येच वारंवार दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटना वारंवार का घडत आहेत, असा सवाल निर्माण होत आहे. सीआरपीएफचे आयजी ऑपरेशन्स जुल्फिकार हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनांना दहशतवादी आणि त्यांचे समर्थक जबाबदार आहेत.

अनेक ठिकाणी दहशतवादी आणि त्यांच्या भूमीगत समर्थकांचा दबाव नागरिकांवर आहे. पोलीस किंवा सीआरपीएफकडून कारवाई केली जाते, तेव्हा दहशतवाद्यांचे समर्थक जवानांवर दगडफेक करण्यासाठी नागरिकांवर दबाव टाकतात. यामुळे आमच्या कारवाईत अडथळा येतो, असं जुल्फिकार हसन यांनी सांगितलं.

लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी संरक्षण सल्लागार अजित डोभाल यांची भेट घेऊन काश्मीरच्या सद्य परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे. शिवाय गुप्तचर यंत्रणेने महत्वाचा अलर्ट जारी केला आहे. या अलर्टनुसार दहशतवाद्यांनी जवानांवर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत.

सुरक्षा व्यवस्थांनी पेट्रोल बॉम्बचे हल्ले रोखण्यासाठी रणनिती आखली आहे. सुरक्षा व्यवस्थांकडून प्रत्येक व्हॉट्सअॅप ग्रुपवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तर दगडफेक करणाऱ्यांपैकी अशा आंदोलनकर्त्यांवर नजर ठेवली जात आहे, जे विविध आंदोलनात सहभागी असतात.

संबंधित बातम्या :

श्रीनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण, पोलिसांवर दगडफेक


काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांवरील दगडफेकीला उत्तर देण्यासाठी 'प्लॅन बी' तयार