गुरेज सेक्टरमधील हिमस्खलनात महाराष्ट्रातील 3 जवानांना वीरमरण
एबीपी माझा वेब टीम | 27 Jan 2017 04:09 PM (IST)
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील बांदीपुराच्या गुरेज सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात 15 जवानांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत महाराष्ट्रातील तीन वीरपुत्र शहीद झाले आहेत. अकोल्याचे संजू सुरेश खंदारे, अकोल्याचेच आनंद गवई आणि बीडचे विकास समुंदरे अशी महाराष्ट्रातील शहीद जवानांची नावं आहेत. सलगच्या बर्फवृष्टीमुळे 25 जानेवारीच्या संध्याकाळी दोन मोठे हिमस्खलन झाले. पहिल्यांदा सैन्याचा एक कॅम्प हिमस्खलनात अडकला. त्यानंतर गस्तीवर असलेले काही जवान हिमस्खलनात अडकले. यामध्ये 15 जवानांचा मृत्यू झाला आहे.
याशिवाय चार नागरिकांनाही या घटनेत प्राण गमवावे लागले आहे. मदत आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे. भारतीय लष्कराच्या जनसंपर्क अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, "खराब हवामानामुळे जवानांचे मृतदेह अद्यापही तिथेच आहेत. हवामान स्वच्छ झाल्यानंतर जवानांचे मृतदेह हेलिकॉप्टरच्या मदतीने श्रीनगरला पोहोचवले जातील." गुरेज सेक्टर श्रीनगरपासून सुमारे 123 किलोमीटर अंतरावर आहे. गुरेज सेक्टर समुद्रसपाटीपासून 8 हजार फूट उंचीवर आहे. पाकव्याप्त काश्मीरला गुरेजची सीमा लागून असल्याने इथे जवानांचा कडेकोट बंदोबस्त असतो.