काश्मीरमध्ये 13 दहशतवाद्यांचा खात्मा, 3 जवान शहीद, 4 स्थानिकांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 02 Apr 2018 08:20 AM (IST)
13 पैकी 11 दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. हे सर्व स्थानिक आहेत.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियन आणि अनंतनाग जिल्ह्याती तीन चकमकींमध्ये सुरक्षा यंत्रणांनी टॉप कमांडरसह 13 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत भारताचे तीन जवानही शहीद झाले. तर चार स्थानिक नागरिकांनाही प्राण गमवावे लागले. महत्त्वाचं म्हणजे अनंतनागमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला, त्यानंतर एकाला ताब्यात घेतलं. या दशहतवाद्याची चौकशी सुरु आहे. दरम्यान, 13 पैकी 11 दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. हे सर्व स्थानिक आहेत. अनंतनागच्या पेठ दियालगाम भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. सुरक्षा यंत्रणांनी या भागाचा ताबा घेत शोधमोहिम राबवली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा यंत्रणांवर गोळीबारही करण्यात आला. त्याला पोलीस आणि जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. शोपियन एन्काऊंटर शोपियनमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये दोन ठिकाणी रात्री उशीरा चकमक झाली. द्रागाद भागात सुरक्षा यंत्रणांनी 7 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर कचदुरा भागातही तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. दक्षिण शोपियनमधील चकमकीत एका नागरिकाचाही मूत्यू झाला. या नागरिकाच्या घरात दहशवाद्यांनी आसरा घेतला होता. काश्मीर खोऱ्यात ट्रेन आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.