सीकर (राजस्थान) : वादग्रस्त वक्तव्यामुळे जैन मुनी विश्रांत सागर चर्चेत आले आहेत. मुलींनी शांत राहायला हवे, असा सल्ला देत, त्यांनी मुलींना ‘वस्तू’ असे संबोधले. तसेच, मुलींवर होणाऱ्या अत्याचारांवेळी 95 टक्के चुका मुलींच्याच असतात, असेही विश्रांत सागर म्हणाले.  


राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात जैन मुनी विश्रांत सागर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुलींबाबत अनेक वादग्रस्त विधानं केली.

“मुलींनी सांभाळून राहिलं पाहिजे, कारण त्यांना माहेर आणि सासर अशा दोन्हींकडील मान राखणं गरजेचं असतं. तसेच, मुलींनी पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावात येऊ नये, शिवाय संस्कारांचं शिक्षणही मुलींनी घेतलं पाहिजे.”, असे ते म्हणाले.

जैन मुनी विश्रांत सागर यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर आता सर्वच स्तरातून टीका सुरु झाली आहे.