चेन्नई : बंगळुरुमध्ये आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याचा चेन्नई विमानतळाच्या उड्डाणपुलावरुन पडून मृत्यू झाला. 32 वर्षीय चैतन्य वुयुरुला सोमवारी पहाटे झालेल्या अपघातात प्राण गमवावे लागले.


चैतन्य उड्डाणपुलाच्या कठड्यावर बसला होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. सीसीटीव्ही फूटेजमध्ये चैतन्य कठड्यावर बसून फोनवर बोलत असल्याचं किंवा सेल्फी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. डोमेस्टिक किंवा आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ड्रॉप करण्यासाठी हा उड्डाणपूल वापरला जातो.

चैतन्यच्या कवटीला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही आत्महत्या आहे की अपघात, याचा तपास पोलिस करत आहेत. चैतन्यकडे कोणतीही बॅग नव्हती किंवा त्याने विमानाचं तिकीटही काढलं नव्हतं, असं पोलिसांनी सांगितलं.

10 फूट उंचीवरुन पडल्यामुळे चैतन्यचा आयफोन नादुरुस्त झाला आहे. त्याच्या फोनमध्ये ई-तिकीट असण्याची शक्यता आहे, त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.

चैतन्यच्या आयकार्डवरुन पोलिसांनी चैतन्यचे वडील जनार्दन राव यांच्याशी संपर्क साधला. चैतन्य विजयवाडाचा रहिवासी असून तो चेन्नईला का आला होता, याची माहिती कुटुंबीयांना नाही.