नवी दिल्ली : सध्याच्या दुनियेत स्त्रिया प्रत्येक गोष्टीमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहेत. महिला सर्व क्षेत्रात आपला गाजावाजा करत आहेत. पण असं असतानाही भारतीय नागरिकांमध्ये स्त्रियांसाठी खरचं आदर आहे का? हे विचार करायला लावणारी परिस्थिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून (National Family Health Survey) काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणात 'पतीने पत्नीला मारहाण करणे योग्य आहे का?' हा प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर विविध अशा 18  राज्यातील नागरिकांनी आपली मत दिली आहेत. ज्यातील विशेषत: महिलांची मतं थक्क करणारी आहेत.


या मतांमध्ये पुरुष आणि स्त्रिया अशा दोघांची मतं घेण्यात आली. ज्यात स्त्रियांचा विचार करता आंध्रप्रदेशमधील (AP) 83.6 टक्के आणि तेलंगणा राज्यातील (Telangana) 83.8 टक्के स्त्रियांना पतीची पत्नीला मारहाण योग्य वाटते. तर याउलट हिमाचल प्रदेशात सर्वात कमी म्हणजे 14.8 टक्के स्त्रियांना हे बरोबर वाटतं. आंध्रा, तेलंगनापाठोपाठ कर्नाटकातील 76.9 टक्के स्त्रियांनी या प्रश्नाबाबत हो उत्तर दिलं आहे. तर हिमाचलनंतर नागालँड (23.9) आणि त्रिपुरामध्ये (29.5) सर्वात कमी प्रतिसाद आला आहे.


पुरुषांचं म्हणणं काय?


याच प्रश्नाबाबत पुरुषांची मतही राज्यनिहाय जवळपास सारखी आहेत. सर्वाधिक म्हणजे कर्नाटकातील 81.9 टक्के पुरुषांना पत्नीला मारहाण करणं बरोबर वाटते. तर त्यानंतर तेलंगणा (70.4) आणि आंध्रप्रदेश (66.5) मधील पुरुषांचा नंबर लागतो. तर सर्वात कमी म्हणजे हिमाचल प्रदेशातील 14.2 टक्के पुरुषांना हे बरोबर वाटतं. त्यानंतर त्रिपुरा 21.3 टक्के आणि नागालँडमधील 34.4 टक्के पुरुषांनी या प्रश्नाचं उत्तर हो दिलं आहे.


काय प्रश्न विचारण्यात आले?


सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये 'पतीने पत्नीला मारहाण करणं योग्य आहे का?' या प्रश्नाला अनुसरुन काही प्रश्न विचारण्यात आले. ज्यामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये पती पत्नीला मारु शकतो असं विचारण्यात आलं. ज्यानुसार 'जर पत्नीने पतीचे ऐकले नाही तर?', 'जर पत्नी पतीला न सांगता बाहेर गेली?', 'जर पत्नी घर किंवा मुलांना वेळ देऊ शकली नाही?' , 'जर पत्नीने संभोग करण्यास मनाई केली तर?' 'जर पत्नीने चांगलं जेवण केलं नाही तर', 'जर पत्नीने सासू सासऱ्यांचा अनादर केला तर?' यासारखे प्रश्न विचारण्यात आले. ज्याला अनुसरुन महिला आणि पुरुषांनी उत्तर दिली.