मुंबई  : रिओ पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या मारियप्पन थांगावेलु आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या वरुण भाटी यांना आलिशान महाराजा एक्स्प्रेसची विशेष टूर देण्यात येणार आहे. भारतीय रेल्वे खाद्य आणि पर्यटन निगम अर्थातच आयआरसीटीसीकडून ही विशेष टूर पदक विजेत्या खेळाडूंना देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.


 

शनिवारी 20 वर्षांच्या मारियप्पन थांगावेलुने उंच-उडी टी-42मध्ये 1.89 मीटर उडी घेत सुवर्णपदक जिंकलं होतं. वरुण भाटीने 1.86 मीटर उंच उडी मारत कांस्य पदक जिंकल होतं. "आम्हाला या अथलीट्सचा सन्मान करताना गर्व वाटतो, ज्यांच्यामुळे भारताला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे," असं आयआरसीटीसीचे सीएमडी ए के मनोचा यांनी सांगितलं.

 

यापूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेल्या पीव्ही सिंधू आणि साक्षी मलिकला या विशेष टूर देण्यात आल्या होत्या. दीपा कर्माकरलाही तिच्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल महाराजाची टूर देण्यात आली होती.

 

महाराजा एक्स्प्रेस ही भारतीय रेल्वेची सिग्नेचर ट्रेन आहे. ही ट्रेन भारतातील विविध महत्त्वाच्या पर्यटनस्थळांना भेट देते. महाराजा ट्रेनमध्ये फाईव्ह स्टार सेवा दिली जाते. या ट्रेनचं प्रवासभाडं अडीच लाखांपासून 15 लाखांपर्यंत आकारण्यात येतं.