जामनगर : गुजरातमधील निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना 30 वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1990 साली कैदेत असलेल्या एका आरोपीच्या मृत्यू प्रकरणी गुजरातच्या जामनगर कोर्टाने संजीव भट्ट यांना ही शिक्षा सुनावली आहे.


1990 मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेवेळी गुजरातच्या जामनगर जिल्ह्यात हिंसाचाराची घटना घडली होती. त्यावेळी संजीव भट्ट जामनगरचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक होते. या हिंसाचारानंतर पोलिसांनी जवळपास 150 लोकांना अटक केली होती. पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी आरोपी प्रभुदास माधवजी वैश्नानी यांचा कोठडीत असताना मृत्यू झाला होता. संजीव भट्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर या आरोपीला कैदेत असताना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर भट्ट यांच्यासह 8 पोलिसांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र तत्कालीन गुजरात सरकारने त्यावेळी पोलिसांविरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली नव्हती. परंतु 2011 मध्ये राज्य सरकारने भट्ट यांच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी दिल्यानंतर हे प्रकरण पुन्हा समोर आले होते.

याप्रकरणी न्यायमुर्ती डी एम व्यास यांनी प्रणवसिंह झाला आणि संजीव भट्ट यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

संजीव भट्ट हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.