IPCC Report 2021 : पृथ्वीचे तापमान वाढल्याने कोणते दुष्परिणाम जाणवतील याबाबत संयुक्त राष्ट्राच्या इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजचा सहावा अहवाल क्लायमेट चेंज 2021-दी फिजिकल सायन्स बेसिस प्रसिद्ध करण्यात आला. ज्यात येणाऱ्या काळात पूर, उष्णलहरी, समुद्राच्या पाणीपातळीत वाढ, कमी वेळात अधिकचा पाऊस आणि त्याचवेळी त्याच्याच जवळ असलेल्या भागात भयंकर दुष्काळी परिस्थितींमध्ये वाढ होणार आहे. त्याचसोबत 21व्या शतकात उष्णतेचे प्रमाण वाढण्याचे आणि थंडीचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे. 


येणाऱ्या 10 ते 20 वर्षात जागतिक तापमानवाढीचा दर 1.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक वाढण्याची चिन्ह आहेत. भविष्यातील तापमान वाढीमुळे नैसर्गिक जगाला हानी पोहोचू शकते. अशावेळी जमीन आणि समुद्र या परिसंस्था वातावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी अपुऱ्या पडतील असे देखील अहवालात नमुद करण्यात आले आहे. त्याचसोबत कार्बन डायऑक्साइडशिवाय इतरही हरितगृह वायूंवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. विशेषत: मिथेन या प्रभावी हरितगृह वायूचे संकट गंभीर आहे. तापमानवाढ रोखायची असल्यास नेट झिरो प्लॅन्सची अंमलबजावणी धोरणकर्त्यांनी करणं गरजेचं आहे. कार्बन डायऑक्साइड नष्ट करणं हे अतिशय कठिण नेट झिरो टूल आहे; मात्र उत्सर्जनाचे प्रमाण कमी केल्यास त्याचा लाभ होऊ शकतो. मात्र सध्याची परिस्थिती बघता धोरणकर्त्यांकडून याबाबतचे प्रयत्न कमी होत आहेत. त्यामुळे पृथ्वीचे तापमान 1.5 ते 2 डिग्रीपर्यंत थांबेल अशी कोणतीच चिन्ह नाहीत. धोरणकर्त्यांकडून आणि सरकारी पातळींवर बघायचं झालं तर ही तापमानवाढ 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत देखील जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


भारत, चीन आणि इतर आशियाई देशात उष्णलहरी अधिक वाढल्या आहेत आणि थंडीचे प्रमाण, यातील एक्स्ट्रीम इव्हेंट कमी झाले असल्याचं देखील अहवाल बोललं गेलं आहे. म्हणजेच स्पष्टपणे बोलायचं झालं तर ग्लोबल वॉर्मिंगचे हे स्पष्ट संकेत आहेत. 


जागतिक हवामान बदलास मनुष्यही कारणीभूत असून त्याच्या हस्तक्षेपामुळे 1970 पासून सागरी तापमानवाढ, त्याचबरोबर पृथ्वीच्यागोठलेल्या भागात बदल आणि समुद्राच्या आम्लीकरणास सुरुवात झाली आहे. 


या अहवालात ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी उपाययोजना देखील सांगितल्या आहेत. ज्यात स्पेसमध्येजमा होणारे कार्बन कमीकरण्यावर भर दिला पाहिजे. सोबतच नेट झिरो आणि इतर ग्रीनहाऊस गॅसेस कमी केले पाहिजेत. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कमीतकमी कार्बन उत्सर्जनमध्ये देखील जागतिक तापमानवाढ होणारच आहे. अशात ह्या तापमानवाढीसोबतच जगण्यासाठीच्या उपाययोजनादेखील करायला हव्यात. 


नोव्हेंबर महिन्यात ग्लासगो, स्कॉटलॅंडमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलाच्या परिषदेमध्ये जागातील बलाढ्य नेते एकत्रित येत हवामान बदलामुळे होणारे परिणाम कमी कसे करता येईल, सोबतच ग्रीनहाऊस गॅसेस कमी करण्यावर भर देणार आहेत, त्यामुळे त्याआधी प्रकाशित झालेल्या या अहवालाला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.