ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी देशात कथित स्वरुपात वाढणाऱ्या असहिष्णुतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. "असहिष्णुता एक शाप आहे, जो गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत आहोत.", असे रतन टाटा यांनी म्हटले आहे. "देशातील प्रत्येक व्यक्तीला माहित आहे की, असहिष्णुता कुठून येते आहे आणि काय आहे. देशातील हजारो-लाखो लोकांमधील प्रत्येकाला असहिष्णुतेपासून मुक्तता हवी आहे.", असे टाटा म्हणाले.


मध्य प्रदेशमधील सिंधिया स्कूलच्या 119 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात संबोधित करताना काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी असहिष्णुतेबाबत आपलं मत व्यक्त केलं. त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना रतन टाटांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मताचं समर्थन केलं. शिवाय, टाटा म्हणाले, "शिंदे यांनी असहिष्णुतेबाबत मत व्यक्त केलं. असहिष्णुता एक शाप आहे, जे गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत आहोत."

रतन टाटा म्हणाले, "आपल्याला देशात असं वातावरण हवं आहे, जिथे आपण सर्वांवर प्रेम करु शकू. कुणाला मारझोड करणार नाही. किंबहुना, प्रत्येकाशी चांगली देवण-घेवाण करत सद्भावनापूर्ण वातावरणात राहू." यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रतन टाटा म्हणाले, "मला वाटतं तुम्ही यशस्वी व्हावं. मात्र, त्याचसोबत मला असंही वाटतं की, तुम्ही विचारवंत बनावं. चर्चा, वाद-विवाद, विश्लेषण आणि असहमती हे सारी सभ्य समाजाची लक्षणं आहेत."

असहिष्णुतेच्या वक्तव्यावरुनच बॉलिवूड अभिनेता आमीर खान वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यावेळी आमीरवर चौफेर टीका झाली होती. त्यामुळे रतन टाटा यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि प्रसिद्ध उद्योगपतींबाबत आमीरवर टीका करणाऱ्यांची काय भूमिका असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.