21 February In History : आजचा दिवस हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे. भारताच्या संविधान निर्मिती प्रक्रियेमध्ये मसुदा समितीने 21 फेब्रुवारी 1948 रोजी घटनेचा मसुदा हा घटना समितीला सादर केला. अमेरिकेतील वादग्रस्त कृष्णवर्णीय नेते माल्कम एक्स यांची आजच्याच दिवशी हत्या करण्यात आली. देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 21 फेब्रुवारी या तारखेला नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांचा तपशील आपण जाणून घेऊया, 


1948: मसुदा समितीने घटनेचा मसुदा संविधानसभेच्या अध्यक्षांना सादर केला


संविधान सभेने 29 ऑगस्ट 1947 रोजी एका ठरावाद्वारे मसुदा समितीची (Drafting Committee)  नेमणूक केली. भारतीय राज्यघटनेच्या (Indian Constitution) मजकुराच्या मसुद्याची छाननी करणे, त्यासंबंधित घेतलेल्या निर्ययांना मान्यता देणे आणि  समितीने सुधारित केलेल्या संविधानाच्या मसुद्याचा मजकूर घटना समितीसमोर (Constituent Assembly of India) विचारार्थ सादर करणे हे या समितीचं काम होतं. 


या मसुदा समितीमध्ये सात सदस्य होते, त्यामध्ये अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के.एम.मुन्शी, मोहम्मद सादुल्ला, बी.एल. मिटर आणि डी.पी. खेतान यांचा समावेश होता. 30 ऑगस्ट 1947 रोजी पहिल्या बैठकीत मसुदा समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. B.R.Ambedkar) यांची अध्यक्ष म्हणून निवड केली. ऑक्टोबर 1947 च्या अखेरीस, मसुदा समितीने घटनात्मक सल्लागार बी.एन. राऊ यांनी तयार केलेल्या संविधानाच्या मसुद्याची छाननी करण्यास सुरुवात केली. त्यात विविध बदल केले आणि 21 फेब्रुवारी 1948 रोजी संविधानसभेच्या अध्यक्षांना म्हणजे डॉ. राजेंद्र प्रसादांना संविधानाचा मसुदा सादर केला.


संविधान सभेच्या चर्चेदरम्यान मसुदा समितीने सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडली. संविधान सभेतील बहुतांश वादविवाद मसुदा समितीने तयार केलेल्या संविधानाच्या मसुद्याभोवती फिरत होते. संविधान सभेच्या 166 बैठकांपैकी 114 बैठका संविधानाच्या मसुद्यावर चर्चेसाठी घेण्यात आल्या. 


1965: अमेरिकेतील वादग्रस्त कृष्णवर्णीय नेते माल्कम एक्स यांची हत्या (Malcolm X)


माल्कम एक्स ((Malcolm X)) हे अमेरिकन मानवाधिकार कार्यकर्ते (Civil Rights Movement)  होते. त्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीय अमेरिकन नागरी हक्क चळवळीमध्ये भाग घेतला आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी ते त्यांच्या वादग्रस्त भूमिकेसाठी ओळखले जायचे. त्यांच्यावर वर्णद्वेष आणि गोऱ्या लोकांच्या विरोधात हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला जायचा. माल्कम एक्स यांची 21 फेब्रुवारी 1965 रोजी अमेरिकेत हत्या करण्यात आली. न्यूयॉर्कमध्ये त्याच्या 400 समर्थकांसमोर त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. या हत्येमागे नेशन ऑफ इस्लाम नावाच्या संघटनेचा हात असल्याचा संशय होता.


1972: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांची चीन भेट (USA- China) 


शीतयुद्धकाळात अमेरिका आणि सोव्हिएत रशियादरम्यान वातावरण चांगलंच तापलं होतं. या दोन देशांमधील वादामुळे जग दोन विभागात विभागलं गेलं आणि तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण झाली. अशात अमेरिकेने धूर्त चाल खेळत रशियाचा जवळचा मित्र चीनशी मैत्रीचा हात पुढे केला. 21 फेब्रुवारी 1972 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड पी. निक्सन यांनी चीनला भेट दिली आणि दोन्ही देशांमधील गेल्या 21 वर्षांच्या दुरावा संपवला. त्याचा परिणाम जागतिक राजकारणावर झाला. 


1999: 21 फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन म्हणून घोषित


आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस (International Mother Language Day) हा बांग्लादेशच्या पुढाकाराने सुरु करण्यात आला. 21 फेब्रुवारी रोजी बांग्लादेशातील (त्यावेळचा पूर्व पाकिस्तान) लोकांनी बांग्ला भाषेला मान्यता मिळावी म्हणून पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांविरोधात लढा सुरु केला. त्यांच्या या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय भाषा दिन साजरा केला जातो. यूनेस्कोने 1999 पासून हा दिवस साजरा करण्याचं जाहीर केलं. 


1999- लाहोर घोषणापत्रावर भारत आणि पाकिस्तानची स्वाक्षरी (Lahore Declaration)


लाहोर घोषणापत्र (Lahore Declaration) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय करार होता. 21 फेब्रुवारी 1999 रोजी लाहोरमधील ऐतिहासिक शिखर परिषदेच्या समारोपाच्या वेळी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि त्याच वर्षी दोन्ही देशांच्या संसदेने त्याला मान्यता दिली. 21 फेब्रुवारी 1999 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी लाहोर घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. 


या घोषणापत्राचा उद्देश दोन्ही देशांमध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणे, तसेच तेथे राहणाऱ्या लोकांची प्रगती आणि समृद्धी हा होता. दोन्ही देशांदरम्यान शाश्वत शांतता आणि सौहार्दपूर्ण संबंध आणि  मैत्रीपूर्ण सहकार्य विकसित करणे असं दोन्ही देशांनी मान्य केलं. पण हा करार काही जास्त काळ टिकला नाही. या करारानंतर अडीच महिन्यांनी म्हणजे, 3 मे 1999 रोजी या दोन देशादरम्यान कारगिर युद्धाची (Kargil War) ठिणगी पडली. 


2001: शतकातील पहिल्या महाकुंभाचा समारोप (Kumbh Mela)


आपल्या देशात धर्म आणि श्रद्धा यांना विशेष स्थान आहे. कुंभमेळा हे सुद्धा श्रद्धेचं असंच एक मोठं रूप आहे. दर 12 वर्षांनी होणारा महाकुंभ (Kumbh Mela) जगातील सर्वात मोठा मानवी मेळावा म्हणून इतिहासाच्या पुस्तकात नोंदवला जातो. भारताच्या कुंभमेळ्याला संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने म्हणजे यूनेस्कोने (UNESCO) जगातील सर्वात मोठा शांततापूर्ण मानवी मेळावा म्हणून मान्यता दिली आहे. या शतकातील पहिला महाकुंभ 2001 मध्ये आयोजित करण्यात आला होता आणि या कुंभाची सांगता 21 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी झाली होती.


2013: हैदराबादमध्ये दोन बॉम्बस्फोट, 17 लोक ठार (Hyderabad Blasts)


21 फेब्रुवारी 2013 रोजी, भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास, हैदराबाद शहरात दोन बॉंम्बस्फोट (Hyderabad Bomb Blast) झाले. गजबजलेल्या दिलसुखनगरमध्ये एकमेकांपासून 100 मीटर अंतरावर हे बॉम्बस्फोट झाले. एकापाठोपाठ एक झालेल्या या दोन बॉम्बस्फोटात 17 लोक ठार झाले तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले.