सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवाद्यांचा संसदेवर हल्ल्याचा कट
एबीपी माझा वेब टीम | 10 Oct 2016 12:56 PM (IST)
नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर आता दहशतवादी पुन्हा एका संसदेवर हल्ला करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनंतर संसदेच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISIनं दहशतवाद्यांना सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्याचे आदेश दिले असल्याची माहिती, सुत्रांकडून समजते आहे. एका खास रिपोर्टनुसार, दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं संसदेवर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा कट रचला आहे. जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरनं हा कट रचल्याची माहिती समजते आहे. 2001 साली भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला जैश-ए-मोहम्मदनं केला होता. या हल्ल्यात अफजल गुरु हा देखील सहभागी होता. काही वर्षापूर्वीच त्याला फाशी देण्यात आली.