नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर दिवसेंदिवस तणाव वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भारत चीनमध्ये सीमावादावर महत्वाच्या बैठका पार पडत आहेत. दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर स्तरावरची ही सर्वोच्च चर्चा वाढलेल्या तणावाला शांत करु शकणार का? हा प्रश्न आहे. बुधवारी सुद्धा दोन्ही देशात मेजर जनरल स्तरावरची चर्चा झाली. पूर्व लडाखमधील पॅट्रोलिंग पॉईंट 14 अशा अनेक भागातील दोन्ही बाजूचे सैन्य मागे घेण्याबाबत यावर विचार झाला. पीपी 15, पीपी 17 चुशुल आणि पँगॉग तलावाजवळील भाग या महत्वाच्या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठीही मोठे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, असे प्रयत्न सुरु असताना तिबेटच्या राष्ट्रपतींनी चीनवर गंभीर आरोप केला आहे. कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीनच्या भारतीय सीमेवर कुरापती सुरु असल्याचं तिबेटचे राष्ट्रपती लोबसँग सॅनगे यांनी म्हटलं आहे.


गलवान आणि हॉट स्प्रिंग भागात काही प्रमाणात सैन्य मागे घेतलं गेलं असलं तरी पँगॉंग लेक च्या भागात परिस्थिती जैसे थे असल्याचं सांगितलं जातंय. किमान दोन्ही देशांमध्ये चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होतोय ही बाब यातून अधोरेखित झालीय. लडाखच्या सीमेवर दोन्ही बाजूंमध्ये ले. जनरल स्तरावर ही बातचीत झाली. गेल्या 37 दिवसांपासून सुरु असलेल्या सीमावादावर काय तोडगा निघतो याकडे दोन्ही देशातील नागरिकांचे लक्ष आहे.

भारत-चीन सीमावादावर महत्वाची बैठक पूर्ण; चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न

भारत चीन सीमेवरील तणावानंतर झालेली चर्चा सकारात्मक निर्णयावर पोहोचली असल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हुआ चिनयुंग यांनी काल दिली होती. कोणत्या देशांने कुठून किती सैन्य मागे घेतलं याची माहिती देण्यास किंवा यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करत आहेत एवढंच उत्तर त्यांनी दिलं.

पूर्व लडाख भागात चीनच्या घुसखोरीमुळे भारत चीन या दोन देशांमध्ये सीमेवर मोठा तणाव आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील लष्करी अधिकारी आणि डिप्लोमॅट्समध्ये एक चर्चा झाली. या चर्चेत ठरल्या प्रमाणे सीमेवरील तणाव निवळण्यासाठी दोन्ही देश सकारात्मक पावलं उचलतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दोन्ही देशात 5 मे पासून तणाव होता, त्यानंतर पहिली चर्चा 6 जूनला चर्चा झाली.

1962 साली दोन्ही देशांमध्ये मोठं युद्ध झालं त्यानंतरही चीनने भारताचा बराच भाग गिळंकृत केला आहे. त्यावेळी, त्याआधी आणि नंतरही कित्येक दशकापासून चीनच्या कुरापती सुरु आहेत, गेल्या काही महिन्यात त्यात वाढ झाली आहे.