रेल्वे प्रवाशांना आजपासून विमाकवच, रेल्वे मंत्र्यांची घोषणा
एबीपी माझा वेब टीम | 06 Sep 2016 11:34 AM (IST)
नवी दिल्ली : रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी प्रवासी विम्याची घोषणा केली आहे. रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना प्रभूंनी या विमा योजनेबद्दल सुतोवाच केलं होतं. रेल्वेच्या प्रवाशांना विमा योजनेच्या माध्यमातून दहा लाखांपर्यंतचा नुकसानभरपाई मिळणार आहे. हा विमा घेणे प्रवाशांवर बंधनकारक नसेल. ऑनलाईन तिकिट बुक करतानाच विम्याचा पर्याय दिसणार आहे. तिकिटाच्या रकमेसोबतच विम्याची रक्कमही प्रवाशांना भरावी लागणार आहे. प्रायोगिक तत्वावर आजपासून एक वर्ष ही सुविधा आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन उपलब्ध केली जाणार आहे. ही सुविधा फक्त कन्फर्म तिकिटांसाठीच लागू असेल. काय आहे ही विमा योजना? *प्रवासादरम्यान मृत्यू किंवा कायमचं अपंगत्व -10 लाख रुपये * कायमचं अंशत: अपंगत्व - 7.5 लाख रुपयांपर्यंत *उपचाराचा खर्च - 2 लाख रुपयांपर्यंत ही विमा योजना श्रीराम जनरल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स आणि रॉयल सुंदरम् जनरल इंन्शुरन्सच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.