नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रशासनाने एक दिलासादायक बातमी दिली आहे. तुमच्याकडे रेल्वे प्रवासाचं कन्फर्म तिकीट असेल, आणि तुमचा प्रवासाचा बेत रद्द झाला, तरी तुमच्याऐवजी दुसरी व्यक्ती त्या तिकीटावर प्रवास करु शकते.


तुमच्याकडे रेल्वेचं कन्फर्म तिकीट असेल आणि ऐनवेळी काही कारणास्तव तुम्ही प्रवास करु शकणार नसाल, तर तुमचे तिकीटाचे पैसे वाया जाणार नाहीत. कारण तुम्ही आपलं तिकीट आता दुसऱ्या प्रवाशाच्या नावेही ट्रान्सफर करु शकाल.

तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा अन्य व्यक्तीला ते तिकीट देता येऊ शकणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रवासाच्या 24 तास अगोदर संबंधित व्यक्तीच्या नावे अर्ज करावा लागेल. काही महत्त्वाच्या स्थानकांवर मुख्य आरक्षण पर्यवेक्षकाला तिकिटावरील नाव बदलण्याचे अधिकार आहेत.

तिकीट कुटुंबातील सदस्य म्हणजे आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पती किंवा पत्नी यांच्या नावेही करता येईल. लग्नाच्या वऱ्हाडातील सदस्यांनाही आपलं तिकीट अन्य व्यक्तींच्या नावे करता येईल. तिकीटधारक सरकारी नोकर असल्यास प्रवासाच्या 24 तास आधी लेखी अर्ज करुन त्याला त्याचं तिकीट दुसऱ्याच्या नावे करता येईल.