मुंबई : कोरोना व्हायरसच्या महामारीने अनेक संकटांना तोंड द्यावं लागत आहे. कोरोनाच्या परिणामामुळे देशभरात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या आहेत. या दरम्यान रेल्वेकडून एक दिलासादायक बातमी आली आहे. अनेक जणांची नोकरी जात असताना रेल्वेने व्यापक प्रमाणात नोकर भर्ती सुरु केली आहे. याची प्रक्रिया देखील सुरु झाली असून रेल्वे मंत्रालयाने असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियनच्या तब्बल 56 हजार जागा भरल्या आहेत.


रेल्वे मंत्रालयानं अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियनच्या 56378 जागांसाठी भरती झाली. निवडलेल्या उमेदवारांच्या पॅनेलला मान्यता देण्यात आली असून 40420 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देखील देण्यात आली. बाकी निवड झालेल्यांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे. यातील काही उमेदवारांचं प्रशिक्षण देखील पूर्ण झालं आहे.

रेल्वे भरती मंडळांनं 31 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान जाहीर केलेल्या 64,371 जागांसाठी संयुक्त भरती जाहीर केली होती. या जागांसाठी एकूण, 47,45,176 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते.

या भरतीसाठी उमेदवारांची तीन टप्प्यात चाचणी घेण्यात आली. कंम्प्यूटर आधारित परीक्षा त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रं पडताळणी केली गेली. यामधून 56,378 उमेदवारांची निवड केली गेली.

कोरोनामुळं सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळं सध्या अनेक उद्योग, व्यवसाय अडचणीत आले आहेत. परिणामी अनेकांचे रोजगार गेले आहेत. बेरोजगारीची कुऱ्हाड अनेक युवकांवर कोसळली आहे. अनेक खाजगी आस्थापनांमधील नोकऱ्या देखील गेल्या आहेत. या काळात रेल्वे मंत्रालयाकडून ही मोठी भरती सुरु केल्याने एक आशेचा किरण निर्माण झाला आहे.