नवी दिल्ली :  रेल्वेमंत्री वैष्णव यांनी पदभार स्वीकारताच रेल्वे मंत्रालयाच्या कामाच्या स्वरुपात महत्वाचा बदल केला आहे. रेल्वे मंत्रालयाचं कार्यालय आता रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार असून कर्मचारी हे दोन शिफ्टमध्ये काम करणार आहेत. हा निर्णय केवळ रेल्वे मंत्रालयापुरताच मर्यादित असणार आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे. 


आपले पंतप्रधान रोज 18 तासांहून जास्त काम करतात आणि देशाची सेवा करतात. मग आम्ही मंत्र्यांनीही तसं करावं. भारतीय रेल्वे ज्या प्रमाणे 24 तास सुरु असते त्याच धर्तीवर आता केंद्रीय रेल्वेमंत्री यांची कार्यालयंही दोन शिफ्ट मध्ये सुरु राहतील, असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं.


रेल्वे मंत्र्यांची कार्यालयं आता दोन शिफ्टमध्ये म्हणजे सकाळी 7 त दुपारी 4  आणि दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. सध्या असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नियमांचं पालन करुन प्रत्येकी 50 टक्के अधिकारी आणि कर्मचारी या दोन शिफ्टमध्ये काम करतील.


आपल्या देशाचे पंतप्रधान हे सलग 18 तास काम करतात, मग आम्ही मंत्र्यांनीही तसं काम का करु नये असा सवाल रेल्वे राज्यमंत्र्यांनी केला. पंतप्रधानांकडून प्रेरणा घेत आम्हीही जास्तीत जास्त वेळ काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं.


रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, "भारतीय रेल्वे जनतेच्या सेवेत 24 तास कार्यरत असते. रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी अहोरात्र मेहनत घेत असतात. त्यामुळेच सर्वसामान्यासह सर्वच घटकातील भारतीयांना प्रवास आणि मालवाहतूक यासाठी रेल्वे जलद आणि सुलभ दळणवळणाचे साधन ठरली आहे. दोन शिफ्ट मध्ये काम केल्यानं रेल्वेच्या कामाला गती मिळेल आणि सेवेत तत्परता येईल".


पहा व्हिडीओ : रेल्वे कर्मचाऱ्यांनाही आता दोन शिफ्ट, पदभार स्वीकारताच रेल्वेमंत्र्यांचा शिस्तीचा कार्यक्रम


 



महत्वाच्या बातम्या :