नवी दिल्ली : भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानातही हालाचालींना वेग आला आहे. पाकिस्तानातील भारतीय राजदूतांना पाकच्या परराष्ट्र मंत्रालयानं बोलावणं धाडलं आहे.


पाकमधील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबवाले यांना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने बोलावलं आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईवर उच्चायुक्तांना एक प्रकारची कारणे दाखवा नोटीस पाठवल्याचं म्हटलं जातं.

पाकिस्तान सरकारवर पाक लष्कराचा वरचष्मा असल्याचं अनेक वेळा पाहायला मिळालं आहे. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकला चोख प्रत्युत्तर देण्याची भाषाही एकीकडे लष्करप्रमुख राहील शरीफ यांच्याकडून बोलली जात आहे. त्यामुळे पाक काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला आहे. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन, 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला.  भारतीय लष्कराच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती आज महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली.

कालच दहशतवादी एलओसी पार करुन भारतात घुसण्याच्या तयारीत होते. मात्र त्याची कुणकुण भारताला लागली. भारतीय जवानांनी थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचा खात्मा केला”, असं रणबीर सिंह म्हणाले.

इतकंच नाही तर भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचंही रणबीर सिंह यांनी ठणकावून सांगितलं.

“घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने काल रात्री सर्जिकल स्ट्राईक केले. यामुळे शत्रूचं मोठं नुकसान झालं. आमच्या सर्जिकल स्ट्राईकचा उद्देश केवळ दहशतवाद्यांना मारणं हेच होतं, जे सीमेवरुन भारतात घुसण्याचा प्रयत्नात होते. आम्हाला हे जास्त वाढवायचं नाही”, असं रणबीर सिंह म्हणाले.

यावेळी रणबीर सिंह यांनी भारताकडून सर्जिकल स्ट्राईक्स केल्याचं सांगितलं. तसंच या सर्जिकल स्ट्राईक्सची माहिती लष्कराने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती, जम्मून काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना दिली होती, असं रणबीर सिंह यांनी सांगितलं.

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून अतिरेकी तसंच घातपाती कारवाया करत आहे. भारत स्वतःहून कधीही शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नाही. पाकिस्तानच्या गोळीबाराला गोळीबारानेच प्रत्युत्तर दिलं जातं. मात्र काल रात्री भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये  सर्जिकल स्ट्राईक्स करून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे.

सर्जिकल स्ट्राईक ही युद्धशास्त्रातील एक संज्ञा आहे. सर्जिकल स्ट्राईकमध्ये  निष्णात सर्जन ज्या पद्धतीने शस्त्रक्रिया करताना नेमक्या ठिकाणची शस्त्रक्रिया करतो, त्याच प्रमाणे आपल्याला अपेक्षित असलेल्या ठिकाणी नेमकी तसंच परिणामकारण आणि अचूक शस्त्र कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक…

थोडक्यात सर्जिकल स्ट्राईक म्हणजेच अतिशय नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाईच असते. गावाकडच्या भाषेत घुसून मारणं.

सर्जिकल स्ट्राईकमध्ये मोठं नुकसान टाळण्यावर भर दिला जातो. आपल्याला अपेक्षित ठिकाणावरच नेमका हल्ला करणं म्हणजेच सर्जिकल स्ट्राईक होय.

साधारणपणे विमानांद्वारे करण्यात येणाऱ्या बॉम्बहल्ल्यात आपल्याला अपेक्षित ठिकाणापेक्षा आजूबाजूच्या परिसराचीही मोठी हानी होत असते. भारताने काल रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या प्रशिक्षण केंद्राना लक्ष्य करत सर्जिकल स्ट्राईक केले.