चेन्नई : भारतीय समुद्र सुरक्षा बल म्हणजेच भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे आकस्मित निधन झाले. राकेश पाल यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने चेन्नई येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी ट्विटरवरुन राकेश पाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. 


राकेश पाल यांना सकाळपासून अस्वस्थ वाटू लागल्याने चेन्नईतील राजीव गांधी सार्वजनिक रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  राकेश पाल हे AVSM, PTM, TM येथील भारतीय तटरक्षक दलाचे 25 वे महासंचालक होते.  तसेच, ते भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थीदेखील होते, जानेवारी 1989 मध्ये ते भारतीय तटरक्षक दलात रुजू झाले होते.