श्रीनगर : पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली आहे. भारतीय जवानांनी 22 दहशतवादी आणि 11 पाकिस्तानी सैन्याचा खात्मा केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये घुसून ही कारवाई केलीय. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे सात तळ उद्धवस्त केल्याची माहिती मिळतेय.


सीमेवर पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. जम्मू काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून अंदाधुंद गोळीबार केला. पाककडून केल्या जाणाऱ्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यात भारतीय लष्कराने सीमेलगत पाकच्या हद्दीत असलेली सात दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या करावाईत दोन भारतीय जवानांना वीरमरण आलं. तर एका नागरिकाचाही मृत्यु झाला. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या छावण्यांना लक्ष्य करण्यासाठी तोफांचा मारा केला. या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याची तळ देखील उद्धवस्त झाली आहेत.

दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी, या उद्देशाने पाकिस्तानी लष्कराने जम्मू काश्मीरमधील सीमेलगतच्या तंगधार सेक्टरमध्ये रविवारी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलं. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लघन करतं भारतीय चौक्यांवर गोळीबार सुरु केला. त्याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे.

दरम्यान, पाकिस्तानने 15 ऑक्टोबरलाही शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. त्यावेळीही भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. यावर्षी पाकिस्तानने आतापर्यंत 2300 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. तर गेल्यावर्षी हा आकडा 1629 होता.

भारतीय लष्करानुसार, शस्त्रसंधीचं उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी हेतून होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद, लश्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यंना नियंत्रण रेषेजवळ थांबवण्यात येतं. जेणेकरुन जेव्हा संधी मिळेल तेव्हा भारतात घुसखोरी करता येईल.