Indian Armed Forces Flag Day 2020 : भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन 2020 (Indian Armed Forces Flag Day 2020) आज 7 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. हा दिवस शहीदांच्या आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांचा सन्मान करण्यासाठी साजरा करण्यात येतो. हा दिवस आपल्या देशातील सर्व सैनिकांसाठी आहे. देशवासी या दिवशी शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहतात. सैनिक म्हणजे, कोणत्याही देशाची सर्वात मोठी संपत्ती असतात आणि देशाला सुरक्षित आणि अखंड ठेवण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका निभावतात. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील सैनिक, नौसैनिक आणि वायू सैनिकांचा सन्मान करण्यासाठी साजरा करण्याची परंपरा आहे. सशस्त्र सेनेच्या तीन शाखा म्हणजेच, भारतीय सैन्य दल, भारतीय वायू सेना आणि भारतीय नौसेना यांच्यावतीने राष्ट्रीय सुरक्षे प्रति आपल्या प्रयत्नांचं प्रदर्शन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात.


दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्यात येत आहे. परंतु, अनेक लोकांना हे माहिती नसतं की, हा दिवस का साजरा केला जातो. याचा इतिहास काय आहे. ज्या व्यक्ती भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन 2020 बाबत माहिती करुन घेण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांच्यासाठी आज आम्ही यासंदर्भात अधिक माहिती देणार आहोत.


भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनाचा इतिहास


28 ऑगस्ट, 1949 मध्ये भारताच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या नेतृत्त्वात एक कमिटी तयार करण्यात आली होती. समितीने निर्णय घेतला की, ध्वज दिन दरवर्षी 7 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येईल. नागरिकांमध्ये लहान झेंड्यांचं वितरण करून त्या बदल्यात सौनिकांसाठी डोनेशन जमा करणं हा भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्यामागील मूळ हेतू होता. गेल्या अनेक वर्षांपासून या दिवसाला महत्त्व आहे. त्यामागील कारण म्हणजे, जवानांच्या कुटुंबाची काळजी घेणं ही भारतातील सर्व जनतेची जबाबदारी आहे.


भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनाचं महत्त्व


देशातील नागरिकांचं कर्तव्य आहे की, त्यांनी केवळ शहीदांची प्रशंसा न करता त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाची काळीजी घ्यावी. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन मुख्यतः सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाचं कल्याण, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी आहे. हा दिवस युद्धात शहीद आणि जखमी सैनिकांच्या पुर्वसनासाठी साजरा केला जातो. याचं महत्त्व आहे कारण हे युद्धात जखमी सैनिक, वीर स्त्रिया आणि शहीदांच्या कुटुंबाची काळजी घेण्याच्या आपल्या कर्तव्याची आठवण करुन देतो.