मुंबई: "सियासत में तेरा खोया या पाया हो नहीं सकता, तेरी शर्तों पे गायब या नुमाया हो नहीं सकता. भले साजिश से मुझको दफ्न गेहरे कर भी दो, पर में सृजन का बीज हूँ, मिट्टी में जाया हो नहीं सकता". एकीकडे सत्तेच्या, राजकारणाच्या कटु अनुभवानंतरही आपल्यातली सृजनात्मकता, मानवीयता कायम ठेवण्याचा हा मनोदय जाहीर करतानाच कुमार विश्वास यांनी देशाच्या जनतेची, युवकांची आम्ही निराशा केली याचीही प्रांजळ कबुली 'माझा कट्टा'वर दिली. याच उदासीनतेमुळे आता देशात पुढील २५ वर्ष कोणतंही मोठं आंदोलन उभं राहणार नाही अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.


'एबीपी माझा'च्या 'माझा कट्टा' या सामाजिक, राजकीय, कला, उद्योग आदी क्षेत्रातील मान्यवरांसोबतच्या गप्पांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. 'एबीपी माझा'तील संपादकीय सहकाऱ्यांनीही त्यांना प्रश्न विचारले.

"हा देश कम्युनिकेट करणाऱ्यांचा आहे. गावात अनेक श्रीमंत असतील मात्र, एखाद्याच्या लग्नात गप्पांचा रंग भरणारा कुणी रंगनाथच मग भले तो कितीही गरीब असला तरी हवा असतो. सध्या तर सर्वात मोठा रंगनाथ देशात आहे. त्याच्याहीपेक्षा रंग भरणारा कुणीतरी आला पाहिजे", या शब्दात कुमार विश्वास यांनी मोदींचं न घेता सद्यस्थितीचं वर्णन केलं. मात्र, त्याचवेळी विरोधी पक्षही सत्ताधाऱ्यांप्रमाणेच अफवांचा प्रचार करण्याचा प्रयत्न करतायत ज्यात सत्ताधारी 'मास्टर' आहेत, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांवर केली. "हे म्हणजे आपल्या हॉकी खेळासारखं झालं. जेव्हा ती गवताळ मैदानावर होती तोवर आपण हॉकी गाजवली मात्र अॅस्ट्रोटर्फवर आल्यानंतर ऑस्ट्रोलिया आदी देश आपल्याला भारी पडू लागले तसं झालं", अशी तुलनाही त्यांनी केली.

दुसरीकडे, अण्णा आंदोलनामुळे केंद्रात व दिल्लीत सत्ता परिवर्तन तर झालं मात्र आम्ही लोकांच्या अपेक्षा, विश्वास यावर पुरे पडू शकलो नाही, अशी खंत कुमार विश्वास यांनी व्यक्त केली. "पराये आसूँओं से आँखे नम कर रहा हूँ मैं, भरोसा आजकल खुद पे कुछ कम कर रहा हूँ मैं....बडी मुश्किल से जागी थी जमाने के निगाहों में, उसी उम्मीद के मरने का मातम कर रहा हूँ मैं ", या शब्दांत त्यांनी आपल्या निराशेला वाट मोकळी करून दिली.  "अशा मोठ्या आंदोलनात बड्या नेत्यांचं काही जात नाही, मात्र शिक्षण-घर-दार सोडून आलेल्या तरूणाईच्या स्वप्नांचा मात्र खून झाला. काळ याचा सूड उगवेल", असंही कुमार विश्वास म्हणाले

आपल्या कवितेच्या प्रवासाबद्दलही कुमार विश्वास यांनी अनेक किस्से सांगितले. खादी कुर्ता आणि मंडपात अडकलेली हिंदी कविता आपण कॉलेज कॅम्पसमध्ये नेली असं सांगून कुमार विश्वास म्हणाले की, मला हिंदी कवितेच्या अंगणातली राखी सावंत असं हिणवलं गेलं. देशातल्या प्रमुख हिंदी कवींनी एकमुखानं माझ्यावर बहिष्कार घातला. मात्र, आज त्यांच्यामुळेच मी आजचा कुमार विश्वास बनलो.

कुमार विश्वास यांच्या प्रेमकहाणीची निष्पत्ती असलेली 'कोई दिवाना कहता है...' ही कविताही त्यांनी यावेळी सादर केली.