Heat wave : देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे, तर कुठे  ढगाळ वातावरण तर कुठे पाऊस पडत आहे. सध्या देशातील तापमानात (Temperature) कमालीची वाढ झाली आहे. बहुतांश शहारात तापमानाचा पारा हा 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या आसपास गेला आहे. उष्णतेचा नागरिकांना त्रास होत असून, दुपारच्या वेळी रस्ते रिकामे दिसत आहेत. 


Temperature: पाहुयात कुठे किती झाली तापमानाची नोंद 


उत्तर प्रदेशातील हमीरपूर आणि प्रयागराज इथं 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची  नोंद झाली आहे. सफदरजंग हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील कमाल तापमान 40.4 अंश सेल्सिअस नोंदवले आहे. जे सामान्य तापमानापेक्षा चार अंशांनी जास्त आहे. दिल्लीत सलग चौथ्या दिवशी कमाल तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले. पुसा आणि पीतमपुरा भागात कमाल तापमान अनुक्रमे 41.6 अंश ते 41.9 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.


पश्चिम बंगालमध्ये तापमानात वाढ


पश्चिम बंगालमध्ये बांकुरा येथे सर्वाधिक 43.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राजधानी कोलकात्यात कमाल 40 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये उष्ण हवामानाची स्थिती कायम राहिली असून दोन्ही राज्यांच्या बहुतांश भागात कमाल तापमान 40 अंशांच्या वर पोहोचले आहे. हरियाणातील हवामान विभागाच्या अहवालानुसार, हिसारमध्ये तापमानाचा पारा 41.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. हरियाणातील कर्नालमध्ये 40.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर अंबालामध्ये 39.7 अंश सेल्सिअस, नारनौल येथे 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.


पंजाब हरियाणातही तापमानाचा पारा वाढला


पंजाबमधील भटिंडा येथे 41 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर अमृतसरमध्ये 36.6 अंश सेल्सिअस आणि पटियालामध्ये 41.2 अंश सेल्सिअसवर तापमानाची नोंद झाली. पंजाब हरियाणाची राजधानी असलेल्या चंदीगडमध्ये 39.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.


राजस्थानच्या वाळवंटी भागात तापमानात वाढ


राजस्थानच्या वाळवंटी भागात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. चित्तोडगडमध्ये 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यानंतर कोटा (42.8 अंश), बांसवाडा (42.7 अंश), फलोदी (42.2 अंश), ढोलपूर (42 अंश), अलवर आणि सवाई माधोपूर (प्रत्येकी 41.7 अंश) आहे. ) टोंक (41.6 अंश), चुरू आणि पिलानी (प्रत्येकी 41.4 अंश), बारमेर (41.2 अंश) आणि जयपूर (40 अंश सेल्सिअस)


आंध्र प्रदेशमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा


शिमला, मनाली, धर्मशाला आणि नारकंडा या लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये अनुक्रमे 25.4 अंश, 21 अंश, 28.2 अंश आणि 19.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (APSDMA) मंगळवारी एका मंडलात तीव्र उष्णतेची लाट आणि राज्यभरातील आणखी 117 ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.


महाराष्ट्रातही तापमानात वाढ


महाराष्ट्रातही तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील दोन दिवस विदर्भाच्या (Vidarbha) तापमानात अधिक वाढ होण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Weather : राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा, तर दुसरीकडं तापमानाचा पारा वाढणार; वाचा हवामान विभागाचा अंदाज