Coronavirus:  मागील 24 तासांत देशभरात 11,683 कोरोनाबाधित आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आजची आकडेवारी जारी केली आहे. देशत सध्या सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ही 66,170 वर पोहचली आहे. कोरोनामुळे 28 रुग्ण दगावले आहेत. देशभरात आतापर्यंत 5,31,258 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या तुलनेत आज शुक्रवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत सात टक्क्यांची घट झाली आहे. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी कोरोनाबाधितांची माहिती जारी केली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात 4 कोटी, 48 लाख, 69 हजार 684 कोरोनाबाधित आहेत. रिकव्हरी दर हा 98.67 टक्के इतका आहे. कोरोनाच्या आजारावर मात करणाऱ्यांची संख्या 4 कोटी 42 लाख 72 हजार 256 इतकी झाली आहे. तर, मृत्यू दर 1.18 टक्के इतका आहे. मागील 24 तासात 10,780 कोरोनाबाधित आजारातून बरे झाले आहेत.  


गुरुवारी देशात कोरोनाबाधितांच्या संख्येने 12 हजाराचा आकडा ओलांडला होता. गुरुवारी, 12,591 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्याआधी बुधवारी 10 हजाराचा आकडा ओलांडला होता. 






कोरोना लसीकरणही जोरात 


राष्ट्रीय लसीकरण मोहीमेतंर्गत आतापर्यंत 220.66  कोटी लशीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 95.21 कोटी डोस हे दुसरा डोस आणि 22.87 कोटी डोस हा प्रीकॉशन डोस आहे. मागील 24 तासात 3,647 कोरोना लशीचे डोस देण्यात आले आहेत. 


महाराष्ट्रात गुरुवारी 1113 बाधितांची नोंद 


महाराष्ट्रात गुरुवारी 1,113  नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, राज्यात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या संख्येनंतर महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 81,59,506 वर पोहचली आहे. तर, मृतांचा आकडा एक लाख 48 हजार 492 वर पोहचला आहे. 


सातारा आणि वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी एकजणाचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा मृत्यू दर 1.82 टक्के इतका आहे. तर, कोरोना रिकव्हरी दर हा 98.11 टक्के आहे. 


मागील 24 तासात 1083 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 6129  सक्रिय रुग्ण आहेत. 


गरज असेल तिथे मास्क वापरा... 


सद्यस्थितीत आढळून येत असलेला व्हेरिएंट्स फारसा घातक नसून यात रुग्ण घरी उपचार घेऊन देखील बरा होत आहे. पेशंटला व्हेंटिलेटर किंवा आयसीयू बेडची गरज पडत नाही. परंतु पेशंटला मात्र काही प्रमाणात त्रास होतो आणि म्हणून पेशंट असेल किंवा सीनियर सिटीजन असतील, यांना देखील विशेष काळजी घेण्याचा आवाहन सरकारने केलेले आहे. गरज असेल तिथे मास्कचा वापर करा, विशेष करून गर्दीच्या ठिकाणी, हॉस्पिटलमध्ये, जिथे इन्फेक्शनचा धोका असतो, तिथे मास्क जर लावला पाहिजे असे आवाहनही करण्यात आले आहे.