नवी दिल्ली : भारतात झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे हे आम्ही आधीपासून सांगत आलो आहोत. आता पाकिस्तानच्या संसदेत त्यांच्या एका मंत्र्यांनं केलेल्या वक्तव्यावरुन आमचा दावा खरा ठरला आहे. पुलवामा दहशतवादी हल्यावेळी काँग्रेसने या हल्ल्याबाबत संशय उपस्थित केला होता आणि पंतप्रधानांवरही काही आरोप केले होते. आता पाकिस्तानच्या मंत्र्याच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे. आता काँग्रेस गप्प का आहे? भारतातील दहशतवादी कारवायांमागे पाकिस्तान आहे की नाही हे काँग्रेसने सांगावं, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींना उद्देशून म्हटलं . एबीपी न्यूजला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.


पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपलाच हात असल्याचे पाकिस्तानने कबूल केले आहे. पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी संसदेत म्हटले आहे की, पुलवामा हल्ला इम्रान खान सरकारसाठी एक मोठे यश आहे. आम्ही भारतात घुसून मारलं. पुलवामामधील आमचे यश हे इम्रान खान यांच्या नेतृत्वात या देशाचे यश आहे. आपण सर्वजण या यशाचा एक भाग आहोत, असं पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटलंय.


पुलवामा हल्ला पाकिस्तान सरकारने घडवला, पाकिस्तानच्या संसदेत मंत्री फवाद चौधरींची कबुली


भारत एक इंच जमीन दुसऱ्या देशाला सोडणार नाही


भारत-चीन सीमावादाबाबत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, चीन सीमेवर भारतीय जवानांनी जे शौर्य आणि संयम दाखवला आहे, त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. भारतीय सैन्याचा आपल्याला अभिमान आहे. चीन सीमेवर सैन्याला आवश्यक सामग्री पोहोचवली जात आहे. चर्चेतून सीमावाद मिटवावा ही भारताची भूमिका आहे आणि यापेक्षा योग्य मार्ग दुसरा नसेल. शेजारील देशांशी चांगले संबंध असावे अशी आमचा प्रयत्न आहे. मात्र असं असताना भारताची एक इंच जमीन काय एक इंचाचं टोकही आपण दुसऱ्या देशाला सोडणार नाही, असं राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितलं.



अभिनंदनसाठी भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानी मंत्र्याला फुटला होता घाम!