India-Afghanistan: भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी अफगाणिस्तानचे (Afghanistan) परराष्ट्र मंत्री मावलावी आमीर खान मुत्तकी यांच्यासोबत चर्चा केली. तालिबान्यांनी अफगाणचा ताबा घेतल्यानंतर प्रथमच भारत आणि अफगाणिस्तानमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. अफगाणिस्ताननं पहलगाम हल्ल्याच्या केलेल्या धिक्काराचं भारताकडून स्वागत करण्यात आलंय. भारत-अफगाणसंबंधीच्या खोट्या बातम्या फेटाळल्याचंही स्वागत एस. जयशंकर यांनी केलंय. पाकिस्ताननं दोन्ही देशांत अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. 

भारताशी शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चेला तयार- शाहबाज शरीफ 

पाकिस्तानी दहशतवादावर भारताने जोरदार प्रहार केल्यावर आता पाकिस्तानी पंतप्रधान शांततेची भाषा बोलू लागलेत. भारताशी शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चेला तयार आहोत असं शाहबाज शरीफ यांनी म्हटलंय. कामरा एअरबेसला त्यांनी भेट दिली. त्यावेळी हे वक्तव्य केलंय. विशेष म्हणजे आधी भारतात दहशतवादी कारवाया करायच्या, मग भारताने दहशतवादावर प्रहार केल्यावर भारतावरच उलट लष्करी कारवाई करायची. मग भारताने तुफान मार दिल्यावर आता शांततेच्या थापा मारायच्या असे प्रकार करण्यात पाकिस्तानी राज्यकर्ते मश्गूल असल्याचं दिसतंय. मात्र भारताची भूमिका ठाम आहे. जोवर पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणं आणि दहशतवादी अड्डे नष्ट करत नाही तोवर कोणतीही चर्चा होणार नाही असं भारताने पाकिस्तानला ठणकावलं आहे. 

गेल्या 48 तासांत सहा दशतवाद्यांना कंठस्नान-

ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर भारतानं आपला मोर्चा जम्मू काश्मीर भागातील स्थानिक दहशतवाद्यांकडे वळवला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं 14 दहशतवाद्यांची एक यादी जाहीर केली होती. गेल्या 48 तासात या यादीतील सहा दशतवाद्यांना भारतीय सैन्यानं कंठस्नान घातलंय. तर उरलेल्या 8 जणांचा शोध सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी ऑपरेशन केलरमध्ये तीन दहशतवादी ठार झाले होते. तर गुरुवारी सकाळी राबवलेल्या ऑपरेशन नादरमध्ये आणखी तीन दहशतवादी मारले गेले. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरनं प्रत्युत्तर-

22 एप्रिलला जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे  दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांवर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, तर 17 जण जखमी झाले होते. भारतानं यानंतर पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना ऑपरेशन सिंदूर द्वारे प्रत्युत्तर दिलं. यापूर्वी भारतानं पाकिस्तानच्या नागरिकांना दिलेला व्हिसा रद्द केला होता. याशिवाय सिंधू जल करार देखील स्थगित केला होता. सिंधू जल करार स्थगित केल्यानं पाकिस्तानला मोठा धक्का बसला.  भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर जोपर्यंत पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया थांबवल्या जात नाहीत तोपर्यंत सिंधू जल करार स्थगित राहील, असं म्हटलं.

संबंधित बातमी:

Shehbaz Sharif on India Pakistan Conflicts: शाहबाज शरीफ म्हणाले, आम्ही शांततेसाठी चर्चा करण्यास तयार; भारतानेही जाहीर केली भूमिका