रिपोर्ट : भारत आशियातील सर्वात लाचखोर देश!
एबीपी माझा वेब टीम | 08 Mar 2017 11:30 AM (IST)
मुंबई : जगभरातील भ्रष्टाचारावर नजर ठेवणाऱ्या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने भ्रष्टाचारासंबंधी एक आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार भारत आशियातील सर्वात लाचखोर देश ठरला आहे. या सर्वेक्षणात 85 टक्के लोकांच्या मते पोलिस सर्वाधिक लाचखोर आहेत. तर 84 टक्के लोकांनी सरकारी बाबू, 79 टक्के लोकांनी कंपन्यांचे अधिकारी आणि 78 टक्के लोकांनी नगरपालिका तसंच नगरपरिषदेचे नगरसेवक लाचखोर असल्याचं म्हटलं आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने आशिया-पॅसिफिकमधील 16 देशांमध्ये 20 हजार लोकांचं सर्वेक्षण करुन हा अहवाल जारी केला आहे. आशियातील देशांमध्ये लाचखोरीच्या प्रकरणात भारत अव्वल स्थानावर आहे. भारतात सरकारी काम करण्यासाठी 69 टक्के भारतीयांना कोणत्या ना कोणत्या रुपात लाच द्यावी लागते. म्हणजेच दहापैकी सात भारतीयांना कधी ना कधी लाच द्यावी लागते. भारतात लाचखोरीमध्ये कंपन्यांचे अधिकारी - 79 टक्के, नगरपालिका आणि नगरपरिषद नगरसेवक - 78 टक्के, खासदार - 76 टक्के, कर अधिकारी - 74 टक्के, धर्माचं राजकारण करणारे -71 टक्के, न्याय देणारे न्यायाधीश 66 टक्के, सरकारी अधिकारी 59 टक्के प्रकरणात भ्रष्ट असल्याचं सर्व्हेत सांगितलं आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालात पाकिस्तानची प्रतिमा भारतापेक्षा चांगली आहे, हे समजल्यानंतर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. सर्व्हेनुसार, पाकिस्तानात 40 टक्के लोकांना सरकारी कामासाठी लाच द्यावी लागते. या सर्वेक्षणात चीन चौथ्या स्थानावर आहे. तर आशियातील जपानमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार होतो. जपानमध्ये सरकारी लाचखोरीचं प्रमाण केवळ 0.2 टक्के आहे.