मुंबई : सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे, हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. 'बीबीसी'साठी सर्व्हे करणाऱ्या 'इप्सॉस मूरी' या संस्थेने हा अहवाल दिला आहे. सहिष्णूतेच्या बाबतीत कॅनडा, चीन आणि मलेशियाच फक्त भारताच्या पुढे आहेत.


चिमुरड्यांवरचे अत्याचार, अल्पसंख्याकांमधली वाढती नाराजी, पुरस्कार वापसी... हे सगळं पाहिल्यावर आपल्या देशात काहीच धड सुरु नाही का, असा प्रश्न विचारला जातो. पण 27 देशांच्या यादीत सहिष्णुतेच्या बाबतीत भारत चक्क चौथ्या स्थानावर आहे.

धक्कादायक म्हणजे चीन दुसऱ्या स्थानावर आहे. चीनमध्ये मुसलमानांवर अनेक निर्बंध आहेत. त्यांना रमझानचा सण साजरा करता येत नाही, रोजे ठेवता येत नाहीत. कामगार क्षेत्रात तर कोणतेही कायदे नसल्याची परिस्थिती आहे. फेसबुक, गुगल यासारख्या वेबसाईट्स तिथे ब्लॉक करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच चीनचा या यादीतला दुसरा क्रमांक धक्कादायक ठरतो.

सर्व्हेनुसार 63 टक्के भारतीय नागरिक विविध संस्कृती, दृष्टीकोनाच्या बाबतीत प्रत्येकाचं वेगळं मत असल्याने ते भारताला सहिष्णू देश मानतात.

राजकीय विचारातील मतभेद तणावाचं कारण बनत असल्याचं 49 टक्के जणांना वाटत असल्याचं सर्व्हेमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 48 टक्के लोक धर्मालाही जबाबदार धरतात तर 37 टक्के लोकांना सामाजिक-आर्थिक दरी तणावाचं कारण वाटते.

हंगरीमधील लोक त्यांच्या देशाला सर्वात कमी सहिष्णू देश मानतात. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि ब्राझिलचा क्रमांक लागतो. भारताचं चित्र रंगवलं जातं तेवढं ते निश्चितच वाईट नाही.

आर्थिक किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतानं केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद असल्याचं अनेकांना वाटतं. म्हणूनच इप्सॉस मुरीच्या या सर्व्हेवर ते विश्वास ठेवायला तयार आहेत.