नवी दिल्ली : चीनसोबत तणाव वाढलेला असतानाच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशिया दौऱ्यावर रवाना झाले आहेत. रशियाकडून हवी असलेली S-400 ही अँटी मिसाईल सिस्टीम डोळ्यासमोर ठेऊन राजनाथ सिंह हे तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर निघाले आहेत. रशियात सोहळा आहे दुसऱ्या महायुद्धाच्या पंचाहत्तरीचा. त्याला चीनच्या संरक्षणमंत्र्यांनाही आमंत्रण आहे. पण भारतासाठी या दौऱ्यात एकच ध्येय असेल ते म्हणजे एस-400 रशियाकडून लवकरात लवकर मिळवणं.


2018 मध्ये रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन हे भारतात आले होते. त्याचवेळी S-400 या अँटी मिसाईल सिस्टीमच्या खरेदीबाबत करार झाला होता. हवाई बचावाची सर्वात आधुनिक सिस्टीम मानली जाते. हा करार होऊ नये यासाठी अमेरिकेचा मोठा दबाव त्यावेळी भारतावर होता.


खरंतर चीन आणि रशियाचे लष्कही संबंधही मधुर राहिले आहेत. चीनला अनेक महत्त्वाची शस्त्रास्त्रं रशियाकडूनही मिळालेली आहेत. आता ज्या S-400 ची भारत वाट पाहतोय, ते चीनला रशियाकडून याच्याआधीच मिळालेलं आहे.


काय आहे S-400 अँटी मिसाईल सिस्टीम?
- या सिस्टीमवरुन चार प्रकारचे मिसाईल एकाचवेळी डागले जाऊ शकतात.
- कमीत कमी शंभर फूट ते जास्तीत जास्त 45 हजार फुटावरचं कुठलंही लक्ष्य भेदण्याची क्षमता
- रडारपासून वाचण्याची क्षमता, कुठल्याही पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक जाम होणार नाही याची खात्री
- अडीचशे किलोमीटर पर्यंत अचूक निशाणा लावण्याची क्षमता


आधीच्या करारानुसार डिसेंबर 2021 पर्यंत ही अँटी मिसाईल सिस्टीम भारताला मिळणार होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेही यात विलंब होत चालला आहे. पण चीनसोबत सीमेवर तणाव वाढल्याने भारताला ही सिस्टीम रशियाकडून लवकरात लवकर मिळवायची आहे.


खरंतर कोरोना संकटामुळे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहणार की नाहीत याची शंका होती. पण चीनसोबतचा तणाव वाढल्याने ही मिसाईल सिस्टीम भारताला अत्यंत गरजेची बनली आहे. ती लवकरात लवकर मिळावी यासाठीची बोलणी करण्याची जबाबदारी म्हणूनच राजनाथ सिंह यांना प्रत्यक्ष हजेरी लावण्याचे आदेश नंतर देण्यात आले. आता त्यात ते किती यशस्वी होतात हे पाहूया.