नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनी प्रदान केल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारांची घोषणा झाली आहे. हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या F-16 या लढाऊ विमानाचा वेध घेत त्यांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याने त्यांचा वीर चक्राने सन्मान होणार आहे. वीर चक्र हा तिसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार आहे. शत्रूला धूळ चारण्यात दाखवलेल्या अभूतपूर्व शौर्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.


याशिवाय स्क्वॉड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना युद्ध सेवा मेडल प्रदान करण्यात येणार आहे. बालाकोट एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या हवाई संघर्षादरम्यान त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

अभिनंदर यांनी 27 फेब्रुवारी रोजी मिग-21 बायसेन या विमानातून पाकिस्तानच्या एफ-16 विमानांचा पाठलाग करुन, एक विमान पाडलं होतं. त्यानंतर एका मिसाईलनने त्यांच्या विमानाला लक्ष्य केलं. विमान कोसळण्याआधी अभिनंदन बाहेर पडले आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये अडकले आणि पाकिस्तानच्या हाती लागले. पाकिस्तानने त्यांना कैद केलं होतं. परंतु भारताच्या कुटनीतीमुळे पाकिस्तानला अभिनंदन यांना सोडावं लागलं.