IMD Weather News : देशात दिवसेंदिवस तापमानाचा (Temperature) पारा वाढत आहे. उष्णतेमुळं नागरिकांच्या अंगाची काहीली होत आहे. या उष्णतेच्या (Heat) पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. दरम्यान, काही राज्यांमध्ये उष्णतेनं कहर केलाय. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), दिल्ली (Delhi) आणि राजस्थानमध्ये (Rajasthan) या तीन राज्यात तापमानाचा पारा हा 46 अंशाच्या पुढे गेला आहे. तर उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra) हे शहर देशातील सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. या शहराचं तापमान हे 46.9 अंशांवर गेलं आहे.  


आग्रा शहर देशातील सर्वात उष्ण शहर 


देशातील बहुतांश शहरात तापमान हे 40 अंशाच्या पुढे गेलं आहे. वाढत्या तापमानामुळं नागरिकांना त्रासाला सामोर जावं लागत आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानबरोबरच इतर अनेक शहरात तापमानात वाढ झालीय. गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेशातही तापमानाचा पारा हा 45 अंशाच्या आसपास गेला आहे. या राज्यांना देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार काल (17 मे) उत्तर प्रदेशातील आग्रा हे शहर देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. येथील कमाल तापमान 46.9 अंशांवर नोंदवले गेले आहे. किमान तापमानही 27.2 होते. पुढील काही दिवस येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.


उत्तर प्रदेशात कमाल तापमान 45 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता 


हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, 18 मे ते 21 मे पर्यंत उत्तर प्रदेशात कमाल तापमान 45 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. या काळात उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आलाय. 18 मे ते 21 मे दरम्यान दिल्लीतील तापमान 44 ते 45 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 18 आणि 19 मे रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. ग्वाल्हेरमध्ये 20 मे रोजी तापमान 46 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 18, 19 आणि 21 मे रोजी 44 ते 45 अंश तापमान राहील. या शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 


राजस्थानमध्ये तापमानाचा पारा 47 अंशावर जाणार


राजस्थानच्या बारमेरमध्ये आज तापमानाचा पारा 47 अंशांवर जाऊ शकतो. 19 मे रोजी 46 अंश आणि 20 व 21 मे रोजी 45 अंश तापमान राहण्याची शक्यता आहे. 18 ते 21 मे दरम्यान पटियाला, पंजाबमध्ये तापमान 45 ते 46 अंश राहण्याची शक्यता आहे. 


उष्माघात टाळण्यासाठी काय आहेत उपाय? 


तीव्र सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळावा
हलके आणि सुती कपडे वापरावेत
घरातून बाहेर पडताना डोके कापडाने झाकावे
डोळ्यांवर सनग्लासेस वापरा
शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका
रोज ओआरएस, लस्सी, ताक, लिंबूपाणी घ्या


महत्वाच्या बातम्या:


दुपारपर्यंत उष्णतेची लाट, दुपारनंतर विजांचा कडकडाट, आज मुंबईत कसं असेल हवामान?