नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान वल्लभभाई पटेल असते तर देशाचं भविष्य आज काही वेगळं असतं, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी दोन दिवसीय अधिवेशनाच्या समारोपावेळी पंतप्रधान मोदी यांनी विकास, काँग्रेस आणि समविचारी पक्षांची महाआघाडी, शेतकरी, राफेल, आर्थिक दुर्बल घटकांना दिलेलं आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.


आधीच्या सरकारने शेतकऱ्यांकडे फक्त मतपेटी म्हणून पाहिलं. आम्ही या अन्नदात्याला उर्जा देण्याचं, त्यांना सशक्त बनवण्याचं काम करत आहोत, असं मोदी म्हणाले. राफेलचं नाव न घेता चौकीदार एकाही चोराला सोडणार नाही, मग तो चोर देशात असो की विदेशात, असा इशाराही त्यांनी काँग्रेस नेत्यांना दिला.

तसंच काँग्रेस आणि महाआघाडीवर हल्ला चढवतानाच, काँग्रेस विरोध करत जन्मलेले आज त्यांच्यासमोर शरणागती पत्कारत असल्याची टीका त्यांनी केली. विरोधकांना देशात मजबूत नको तर मजबूर सरकार हवं असल्याचा टोला त्यांनी महाआघाडीबाबत लगावला. भाजपाच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात विकास कामांना गती मिळाली, असंही ते म्हणाले.

राम मंदिराच्या मुद्द्यावरही पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं. 'राम मंदिराच्या मुद्द्यावर काँग्रेस वकिलाच्या माध्यमाने कोर्टात अडथळा आणत आहे. काँग्रेसला वाटत नाही की अयोध्येत राम मंदिर व्हावं. काँग्रेसच्या या रामविरोधी भूमिकेला आपण विसरु नका आणि विसरु देऊही नका, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर शाब्दिक हल्ला केला.

हा तर ट्रेलर आहे, महाआघाडीचा पिच्चर अजून बाकी आहे
ज्या पक्षांचं जन्म काँग्रेसला विरोध करण्यासाठी झाला होता, ते पक्ष आज काँग्रेससोबत आघाडी करत आहेत. तेलंगणा, कर्नाटक या राज्यामध्ये काँग्रेसची ज्या पक्षासोबत झाली, त्याचे परिणाम आपल्याला माहितच आहे. कार्नाटकमध्ये काँग्रेस ज्या पक्षासोबत मिळू सत्ता स्थापन केली, त्या पक्षाचे मुख्यमंत्री म्हणतात की ते कारकून बनून राहिले आहेत. हा तर ट्रेलर आहे, महाआघाडीचा पिच्चर अजून बाकी आहे, असं मोदी म्हणाले. हे सगळे लोक एका माणसाच्या विरोध एकत्र आले आहेत, पण यांचा उद्देश पूर्ण होऊ देणार नाही, अशा शब्दात मोदींनी आघाडीवर टीका केली.