भोपाळ : भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ मतदारसंघातील खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना त्यांच्या वादग्रस्त विधानांची अखेर उपरती झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी सातत्याने वादग्रस्त विधाने करुन पक्षाला अडचणीत आणले होते. परंतु साध्वी प्रज्ञा यांनी आता आपण पक्षशिस्तीचे पालन करणार असल्याचे म्हटले आहे.


लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान साध्वी प्रज्ञा यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्यावर त्यांच्या पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील आपण साध्वी यांना माफ करणार नसल्याचे म्हटले होते.

वादग्रस्त विधानांमुळे भारतीय जनता पक्षाच्या अनुशासन समितीने साध्वी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसला उत्तर देताना साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले आहे की, मी पक्षाची शिस्तबद्ध सदस्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनेत शिस्त असायलाच हवी. मी त्या शिस्तीचे पूर्णपणे पालन करेन. त्यामुळे मला संधी मिळेल तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला आवडेल.

काय होतं प्रकरण?
'नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील. त्याला दहशतवादी म्हणवणाऱ्यांनी आधी अंतरंगात डोकावून पाहावं. अशा लोकांना निवडणुकीत योग्य उत्तर मिळेल', असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले होते. मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक आणि अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्याला प्रज्ञा यांनी प्रत्युत्तर दिले होते. गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता. त्यानंतरच देशात दहशतवादाची सुरुवात झाल्याचे हासन म्हणाले होते.

निकालानंतर भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रतिक्रिया | भोपाळ | ABP Majha


भाजपकडून वक्तव्याचा निषेध
दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याशी आपण असहमत नसल्याचे भाजप नेते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी स्पष्ट केले होते. ते म्हणाले होते की, "साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा भाजप निषेध करतो. पक्ष त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवेल. त्यांनी या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी."

साध्वी यांचा माफीनामा
सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर नथुराम गोडसे देशभक्त असल्याच्या वक्तव्याप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांनी माफीनामा सादर केला. साध्वी त्यामध्ये म्हणाल्या की, 'ते माझं वैयक्तिक मत होतं. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र कोणाचं मन दुखावलं असल्यास माफी मागते. गांधीजींनी देशासाठी जे केलं, ते विसरता येण्यासारखं नाही. माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला' अशी पुष्टी त्यांनी जोडली होती.