हैदराबाद : ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करुन खळबळ माजवणारा हॅकर सय्यद शुजाचे काही दावे एबीपी माझाच्या पडताळणीत फोल ठरले आहेत. 13 मे 2014 रोजी हैदराबादमधल्या उप्पलमध्ये भाजप आमदार किशन रेड्डी यांनी 11 लोकांची हत्या केली. या हल्ल्यात आपण थोडक्यात बचावलो, असा दावा कथित हॅकर सैय्यद शुजाने केला होता. मात्र जेव्हा एबीपी माझाची टीम उप्पलमध्ये पोहोचली, तेव्हा हा दावा खोटा असल्याचं उघड झालं.


13 मे 2014 रोजी उप्पलमधील लिटल फ्लॉवर ज्युनिअर कॉलेजजवळच्या काकी रेडीच्या गेस्ट हाऊसमध्ये हल्ला झाला होता, असा दावा सय्यद शुजाने केला होता. यानंतर एबीपी माझाच्या टीमने या कॉलेजमध्ये जाऊन आणि आजूबाजूच्या परिसराची पडताळणी केली असता इथे एकही गेस्ट हाऊस नसल्याचं समोर आलं.

एवढंच नाही तर एबीपीच्या टीमने कॉलेज स्टाफ, पेपरविक्रेते, पानविडी दुकानदार आणि काही स्थानिकांशी बातचीत केली. पण इथे कोणतंही गेस्ट हाऊस नसल्याचं सगळ्यांनी सांगितलं. एवढी मोठी घटना घडली, परिसरात गोळीबार झाला तर स्थानिकांना समजणार नाही हे शक्यच नाही, असंही गावकरी म्हणाले. इथे कोणीही घटनेबाबत ऐकलं किंवा पाहिलं नाही. याचाच अर्थ एबीपी माझाच्या पडताळणीत सय्यद सुजाचा दावा खोटा ठरला आहे.

संबंधित बातम्या

ईव्हीएमच्या हॅकिंगचा दावा, सी ग्रेड चित्रपटाची पडेल स्टोरी

EVM सुरक्षित, कायदेशीर कारवाईचा विचार : निवडणूक आयोग

ईव्हीएम हॅकिंगमुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, हॅकरचा दावा