नवी दिल्ली : सीबीएसई पेपर लीक प्रकरणामध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या पेपर लीकची पुन्हा चौकशी होणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून आज पत्रकार परिषद घेण्यात आली.


पेपर लीक प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून गरज पडल्यास केवळ दिल्ली, हरियाणा विभागांमध्येच पुन्हा परीक्षा घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान सीबीएसई बोर्डाचा बारावी अर्थशास्त्राचा पेपर 25 एप्रिलला होणार आहे.

दहावीचा गणिताचा पेपर 28 मार्चला झाला होता. तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर 27 मार्चला घेण्यात आला होता. हे दोन्ही पेपर लीक झाल्याचं समोर आलं होतं.

दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षांदरम्यान, पेपरफुटीच्या अनेक घटना घडल्या. त्याचं लोण महाराष्ट्रातही पसरलं होतं. या पेपरफुटीमुळे सीबीएसईने दोन पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला होता.

मुलांना सीबीएसई फेरपरीक्षेला बसवू नका : राज ठाकरे

कुठल्याही परिस्थितीत तुमच्या मुलांना सीबीएसईच्या फेरपरीक्षेला बसवू नका, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशभरातील पालकांना केलं आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या दहावीचा गणित आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटला होता. दहावीचा गणिताचा पेपर 28 मार्चला झाला होता. तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर 27 मार्चला घेण्यात आला होता. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी दोन्ही विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

पण पेपर फुटीमध्ये सरकाराचा अक्षम्य हलगर्जीपणा असल्याचं मनसे अध्यक्षांनी सांगितलं. राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर प्रसिद्धीपत्रक जारी करुन पालकांनी आपल्या मुलांना फेरपरीक्षेला बसवू नका, असं आवाहन केलं.