लालूंना आणखी किती वर्ष निवडणूक लढवता येणार नाही?
एबीपी माझा वेब टीम | 07 Jan 2018 05:38 PM (IST)
लालूंना वरिष्ठ न्यायालयाने दिलासा दिला नाही, तर त्यांना आयुष्यभर निवडणूक लढवता येणार नाही, असं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे.
नवी दिल्ली : आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी साडे तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सुनावणीनंतर आता लालूंना निवडणूक किती वर्ष लढवता येणार नाही, हा प्रश्न सर्वांना पडणं स्वाभाविक आहे. याबाबत आम्ही जाणकारांशी बातचीत केली. लालूंना वरिष्ठ न्यायालयाने दिलासा दिला नाही, तर त्यांना आयुष्यभर निवडणूक लढवता येणार नाही, असं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे. वरिष्ठ वकिलांच्या म्हणण्यानुसार, लालू प्रसाद यादव यांना दोन प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे, ती वेगवेगळी भोगावी लागणार आहे. म्हणजे एका प्रकरणातील 5 वर्षांची आणि दुसऱ्या प्रकरणातील साडे 3 वर्षांची, जी एकूण साडे 8 वर्षांची होते. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोणताही व्यक्ती तुरुंगवास भोगल्यानंतर 6 वर्षे निवडणूक लढवू शकत नाही. म्हणजे सद्यपरिस्थितीत लालू प्रसाद यादव साडे 14 वर्षे निवडणूक लढवू शकत नाहीत. विशेष म्हणजे चारा घोटाळ्यातील आणखी काही प्रकरणांचा निकाल येणं बाकी आहे. त्यातही लालूंना शिक्षा सुनावण्यात आली, तर हा काळ आणखी वाढू शकतो. इतर प्रकरणांचा विषय बाजूला ठेवला तरी सध्या ज्या दोन प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आलीय, त्याच्या आव्हानावर सुनावणी चालूच राहिल. या काळात जामीन मिळाला तर ते तुरुंगातून बाहेर तर येतील, मात्र आरोप कायम राहिल. म्हणजेच वरील कोर्टामध्ये केलेल्या अपीलावर सुनावणी 4 ते 5 वर्षे सुरु राहिली आणि तरीही निर्णय लालूंच्या विरोधात आला तर साडे 14 वर्षांमध्ये चार ते पाच वर्षांची भर आणखी पडेल. लालूंचं वय सध्या 70 वर्षे आहे. मात्र सध्या ते ज्या पद्धतीने कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत, ते पाहून पुन्हा निवडणूक लढवू शकतील, असं कायदेतज्ञांना वाटत नाही. निवडणुकीच्या राजकारणात परतण्याचा त्यांच्यासमोर एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे सर्व प्रकरणांतून त्यांची निर्दोष मुक्तता होणं, जे सध्या अशक्य दिसत आहे.