लखनौ : भारतीय लष्कराने दोन-तीन दिवसांपूर्वी भारत-पाक सीमेवर 'सर्जिकल स्ट्राइक'सारखी मोठी कारवाई केली असल्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत. त्यांनी काहीही स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी शहीद बीएसएफ जवान नरेंद्र कुमार यांची निर्घृण हत्या आणि मृतदेहाच्या विटंबनेचा बदला घेतल्याचं त्यांच्या या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे.


उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलं. ''पाकिस्तानने बीएसएफ जवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची ज्या पद्धतीने विटंबना केली... कदाचित तुम्ही पाहिलं असेल.. काही तरी झालं आहे, मी सांगणार नाही. विश्वास ठेवा, सगळं काही ठिक-ठाक झालंय, दोन-तीन दिवसांपूर्वी आणि पुढेही दिसेल काय होतंय ते,'' असं राजनाथ सिंह म्हणाले.

''मी आपल्या बीएसएफ जवानांना सांगितलं होतं, शेजारी आहेत, त्यांच्या दिशेने पहिली गोळी तुम्ही चालवू नका. पण समोरून गोळी झाडली गेल्यास आपल्या गोळ्या मोजू नका,'' असंही राजनाथ सिंह म्हणाले.

''ज्या चीनने भारतावर हल्ला केला ते चीन आता भारताची ताकद जाणून आहे. त्यामुळेच भारत-चीन सीमेवर आज चीनकडून शस्त्रे उगारली जात नाहीत. केवळ धक्काबुक्कीचे प्रकार घडतात आणि नंतर 'थँक यू' बोलून चीनचे सैनिक माघारी परततात,'' असं राजनाथ सिंह म्हणाले.

संबंधित बातमी :
उरी सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज