जम्मू काश्मीर : अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 7 भाविकांचा मृत्यू झाला, तर 19 भाविक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. शिवाय, गृहमंत्रालयाची टीमही आज अनंतनागला जाऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करणार आहे.


अमरनाथ यात्रेतील भाविकांवर दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कांवड यात्रेचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, अमरनाथ यात्रेतल्या भाविकांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर चोख सुरक्षेत भाविकांचा दुसरा गट रवाना झाला आहे. भाविकांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतरही भाविकांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. काहीही झालं तरी भोलेनाथाचं दर्शन घेणार असल्याचं भाविकांनी म्हटलं आहे.

अमरनाथ यात्रेतील भाविकांवर दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 19 भाविक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी बातिंगूमध्ये पोलिसांच्या पथकावरही हल्ला केला.